
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. तर नाना पटोले यांनी शिंदे यांच्यावर पलटवार करत भाजपशी गद्दारीचे आरोप केले.
19 जून रोजी शिवसेनेच्या दोन गटांनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाने आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाने आपापल्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा केला. मात्र, या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा संघर्ष पुन्हा एकदा प्रखर झाला आणि एकमेकांवर जोरदार टीकांचा वर्षाव झाला. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिंदे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका करताना थेट पाकिस्तानचा उल्लेख करत जोरदार टोला लगावला.
राहुल गांधी पाकिस्तानची भाषा का बोलतात? त्यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ पुरस्कार हवा आहे का? असा सवाल उपस्थित करून शिंदे यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ऑपरेशन सिंदूर प्रकरणानंतर राहुल गांधींनी दिलेल्या प्रतिक्रियेवरूनच ही टीका सुरू झाली होती. शिंदे म्हणाले की, 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. हे ‘हात’ नव्हते, तर ‘हत्यार’ होते, मोदींचं हत्यार. त्यांनी असा दावा केला की, काँग्रेसच्या काळात पाकिस्तानला कधीच असं उत्तर मिळालं नव्हतं.

राजकीय वादळ उधाणले
पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की राहुल गांधी लष्करावर आणि पंतप्रधानांवर अविश्वास दाखवत आहेत. उलट पाकिस्तानवर विश्वास ठेवतात. पाकिस्तानमध्ये त्यांना हिरो मानलं जातं, पण भारतात जनता त्यांना झिरो बनवेल, असं सणसणीत विधान त्यांनी केलं. शिदेंच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या अपयशांवर बोट ठेवलं आणि शिंदेंना मिर्ची का लागली? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. पटोले म्हणाले, शिंदेंना आता भाजपची दलाली आणि महाराष्ट्राशी गद्दारी करणे एवढंच उरलंय. प्रसिद्धीसाठी त्यांना राहुल गांधींचं नाव घ्यावं लागतं.
नानांनी खोचक टोला लगावत म्हटलं की, ईडीपासून वाचण्यासाठी खोकेबाजगिरी करणाऱ्या शिंदेंना नैतिकतेचा अधिकार नाही.एकनाथ शिंदे यांचा वर्धापन दिन फक्त जल्लोषात नव्हता, तर सत्तेच्या बळावर आणि विरोधकांवर केलेल्या घणाघाती टीकांमध्ये बुडालेला ठरला. निवडणुकीपूर्वीच्या रणधुमाळीतून त्यांचे हे विधान वादळ निर्माण करणारे ठरले. पण काँग्रेस आणि ठाकरे गटाकडूनही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे वर्धापन दिनाचे व्यासपीठ, संघर्षाचं रंगमंच ठरले आहे. येत्या काळात ही आरोप प्रत्यारोपांची मालिका कोणत्या वळणावर पोहोचेल याचा अंदाज कुणालाही नाही.