
देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर व्हिसा रद्द करून तातडीने हकालपट्टीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. भारतात विविध कारणांनी व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज या आदेशाची अंतिम मुदत असून, दिलेल्या वेळेत जे पाकिस्तानी नागरिक भारत सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. प्रत्येक राज्याला आपापल्या हद्दीत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ परत पाठवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. देशभरात या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शोध मोहिमा राबवण्यात येत आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मोठे वक्तव्य केले. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही. सर्व नागरिक सापडले असून, त्यांना परत पाठवण्याची कारवाई सुरू आहे. चुकीच्या अफवा पसरवू नका.

हकालपट्टी होणार
फडणवीस पुढे म्हणाले, मी गृहमंत्री म्हणून सर्व जनतेला आश्वासन देतो की, महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक गायब नाही. ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे निराधार आहेत. सर्व नागरिक अधिकृतपणे ओळखले गेले आहेत. त्यांना लवकरात लवकर त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल. पाकिस्तान्यांना भारतात जागा नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात पाच हजारांपेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक असल्याचे आढळून आले आहे.
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी नागरिकांची नोंद झाली आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात 1 हजार 106 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. मुंबईसारख्या मोठ्या महानगरात केवळ 14 पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे. तपासणीदरम्यान, फक्त 51 नागरिकांकडे वैध कागदपत्रे असल्याचे आढळले, तर सुरुवातीला 107 नागरिक बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अफवांना पूर्णविराम देत ठामपणे सांगितले की, एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढत असलेल्या अनधिकृत फ्लेक्सवर देखील संताप व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राज्यभरात ज्या अनधिकृत फ्लेक्स लागले आहेत, ते तातडीने हटवण्यात यावेत. मी स्वतः सर्व महापालिकांना आदेश दिले आहेत की, माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा समर्थकांनी जर माझ्या नावाने अनधिकृत फ्लेक्स लावले असतील, तरी तेही तातडीने काढून टाका. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शहरे विद्रूप होत आहेत. त्यामुळे आता कडक भूमिका घ्यावीच लागेल. जाहिरात करायची असल्यास केवळ अधिकृत ठिकाणीच करा.