
अकोला येथे शेतकरी जागर मंचने कर्जमाफी आणि हमी भाव कायद्याच्या मागणीसाठी रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेत जागर आंदोलन केले.
शेतकरी जागर मंचने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनोख्या आंदोलनाचे आयोजन केले. रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले. भजनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत या आंदोलनाला एक अनोखा रंग देण्यात आला. कृषी हमी कायदा आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसह विविध प्रश्नांवर या आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधले.
आंदोलकांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत लोकशाही व्यवस्थेतील विश्वासघात मान्य नसल्याचे ठणकावले. सरकार व प्रशासन शेतकऱ्यांशी उद्धट आणि क्रूरपणे वागत असल्याचा आरोप करत या जनजागृती आंदोलनाची गरज भासल्याचे आंदोलकांनी सांगितले.

निवडणुकीतील यश-अपयशाला न पाहता, कामावर लक्ष केंद्रित करणारे Sunil Mendhe
भाजपने दिलेल्या आश्वासनाचा विसर?
आंदोलकांच्या मते, 19 नोव्हेंबर 2021 रोजी भाजपने कृषी माल हमी कायदा अस्तित्वात आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन वर्षे उलटूनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या मागणीसाठी वयोवृद्ध शेतकरी हरियाणाच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, तरीही सरकार चर्चेसाठी तयार नाही, अशी टीका आंदोलकांनी केली.
आंदोलनस्थळी मशाली पेटवून सरकारला तीव्र इशारा देण्यात आला. आंदोलकांनी विविध फलक हातात घेतले होते ज्यावर हमीभाव कायदा झाला पाहिजे, सोयाबीन, कापूस आणि इतर शेतीमालाला योग्य भाव मिळावा अशा मागण्या लिहिल्या होत्या. मशालींच्या प्रकाशात आंदोलन तीव्रतेने पुढे सरकले.
जनजागृतीचे ध्येय
आंदोलकांनी स्पष्ट केले की, शेतकरी जागर मंच प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करत आहे. सरकार झोपेत आहे, पण शेतकऱ्यांच्या झोपेचे बारा वाजले आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला.
सरकारने त्वरित कृषी हमी कायद्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.