
पुढची सत्ता हवी असेल तर विकासाचं स्वप्न आणि कृती दोन्ही लागतात, निव्वळ घोषणांनी नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी आणि शरद पवार यांना सत्ता विसरा, असा इशारा दिला आहे.
राजकारणात डावपेच, टीका आणि विधानं यांची सतत उजळणी होत असते, पण यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ज्यांच्या व्हिजनमध्ये विकासाचा अजेंडा नाही. त्यांनी पुढील पंधरा वर्ष तरी सत्तेच्या स्वप्नात गुंगू नये, असा सल्ला देत बावनकुळे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना डोळे उघडावे असा चिमटा काढला आहे.
बावनकुळे म्हणाले की, आजचा मतदार हा बुडबुडा पाहत नाही, तो भविष्यातील भक्कम रचना शोधतोय. त्यामुळेच जनतेने सातत्याने भाजप आणि महायुतीवर विश्वास दाखवला आहे. फक्त टीका करण्याच्या आधारावर सत्ता मिळणार नाही. मतदार आता डबल इंजिन सरकारची अनुभूती घेत आहे, त्यामुळे विकासाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्यांना लोकशाहीमध्ये थांबवण्याची ताकद जनतेकडे आहे.

महायुती एकत्र
शरद पवार यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीत काय सुरू आहे, याचा आधी शोध घ्या. त्यात एकमेकांच्या पायावर पाय ठेवण्याचीच स्पर्धा आहे. आमचं मात्र स्पष्ट आहे, महायुती एकसंध आहे, बळकट आहे, आणि आम्ही एकत्र लढणार. गरज भासल्यास स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण लढत होईल, पण राज्यपातळीवर सत्ता पुन्हा आमच्याच हातात येणार आहे. हे लक्षात घेऊन पवारांनी सत्ता हे स्वप्न 15 वर्ष तरी बाजूला ठेवावं.
राहुल गांधींच्या मतदारवाढीवर संशयाच्या विधानावरही बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी आठवण करून दिलं की, 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या सात कोटी 29 लाख होती आणि त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ती सात कोटी 59 लाखांवर गेली. तेव्हा राहुल गांधींनी काहीच प्रश्न उपस्थित केला नव्हता. पण आता 2024 मध्ये 39 लाख मतदार वाढले म्हणून आयोगावर संशय घेतला जातो. याला म्हणतात पराभवाची भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव.
गांधी अभ्यास करत नाहीत
बावनकुळे पुढे म्हणाले, महायुतीने 3 कोटी 17 लाख मतांपर्यंत झेप घेतली, तर काँग्रेस 2 कोटी 17 लाखांवर आली, म्हणजे त्यांनी 33 लाख मतं गमावली. ही आकडेवारी अभ्यास करणाऱ्यांसाठी पुरेशी आहे. पण राहुल गांधी अभ्यास करत नाहीत, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. हे युग डेव्हलपमेंटचे आहे. विकासाची भाषा न करणाऱ्यांना जनतेने डावलायला सुरुवात केली आहे. पुढची 15 वर्ष राहुल गांधी, शरद पवार आणि त्यांच्या सारख्यांनी सत्तेच्या समीकरणातून स्वतःला दूर ठेवावं, कारण देश विकासाच्या पटावर पुढे सरकत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या सडेतोड विधानांमुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडण्याची शक्यता असून, येणाऱ्या काळात ही जुनी-नवी पिढी आणि विकास विरोधक यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.