
रामनवमीच्या पावन पार्श्वभूमीवर माजी खासदार रामदास तडस यांच्या सोबत वर्धा येथे अपमानास्पद झाल्याचे उघडकीस आले आहे.
देशभरात रामनवमीचा जल्लोष सुरू असतानाच वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी शोभायात्रा, रॅली, आणि मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात वर्धा देवळी येथील राम मंदिरात एक वादग्रस्त प्रसंग घडला. माजी खासदार रामदास तडस यांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेली चाळीस वर्षे ते रामनवमीच्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी जात असून गर्भगृहात प्रवेश करून पूजा करत होते. मात्र, यावर्षी त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. द लोकहित लाईव्हशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये या प्रकरणानंतर नाराजी पसरली आहे. या घटनेबाबत बोलताना रामदास तडस यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे मी माझ्या कार्यकर्त्यांसह मंदिरात गेलो होतो. मात्र, तिथल्या पुजाऱ्यांनी मला गर्भगृहात प्रवेश नाकारला. मुख्य पुजारी आणि मंदिर ट्रस्टचे प्रमुख पुण्याहून येतात आणि फक्त रामनवमीला येथे असतात. त्यांनीच हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, सोवळे (धार्मिक पारंपरिक वस्त्र) न नेसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे समजते. या निर्णयावरून पुजारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. स्थानिक नागरिकांमध्ये देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.

Yavatmal : कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट आक्रमक
भ्रष्टाचाराचा आरोप
काहींनी हा प्रकार जातीभेदाशी संबंधित असल्याचा संशयही व्यक्त केला, मात्र तडस यांनी यास नकार दिला आहे. त्यांचा दावा आहे की हा मुद्दा जातीचा नसून मंदिर प्रशासनातील अनागोंदी आणि गैरव्यवहाराचा आहे. माजी खासदार तडस यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, मंदिराच्या ट्रस्टने 200 एकर जमीन विकली आहे. मोठ्या प्रमाणात तिथे भ्रष्टाचार सुरू असल्याचे सांगितले. हे मंदिर खाजगी ट्रस्टच्या अधिपत्याखाली आहे, मात्र मंदिराला लोकांनी जागा दान दिलेली होती. आता ती विकली जात आहे, आणि प्रशासन पारदर्शक नाही, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक भाविक आणि कार्यकर्त्यांनी देखील मंदिर प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून इथली रॅली आणि इतर धार्मिक कार्यक्रम मंदिराच्या मदतीने पार पडतात. मात्र यावर्षी मंदिर प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे लोक नाराज झाले आहेत. तडस यांनी स्पष्ट केले की, वाद न वाढवता त्यांनी बाहेरूनच दर्शन घेण्याचा निर्णय घेतल. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. राम मंदिर हे जनतेसाठी आहे की काही मोजक्या लोकांसाठी? असा सवाल तडस यांनी केला आहे.
Chandrashekhar Bawankule : बळीराजाच्या हक्कांसाठी निर्धाराने उभे सरकार