
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाम भूमिका मांडली. संविधान, समता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर संविधान, समता आणि सामाजिक न्याय यांची आठवण करून देणारे कार्यक्रम सुरू असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी राजकारणावर जोरदार टीका करत ठाम भूमिका मांडली. संविधान रक्षकांची भूमिका बजावत, त्यांनी मोदी सरकारच्या एकतर्फी कारभारावर आणि विभाजनवादी राजकारणावर जळजळीत भाष्य केले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या परखड विधानांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यांच्या भाषणात सामाजिक समरसतेचा आत्मा ठळकपणे जाणवतो. काँग्रेसने केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांनी भाजपाच्या राज्यकर्त्यांच्या आत्मप्रशंसात्मक धोरणांची खरडपट्टी काढली.
प्रचारप्रधान भाषणबाजीवर भर
सपकाळ यांनी बाबासाहेब आंबेडकर व पंडित नेहरु यांच्यातील सलोख्याच्या संबंधांची आठवण करून दिली. नेहरूंनी बाबासाहेबांना देशाच्या पहिल्या कायदा मंत्रिपदाची दिलेली जबाबदारी हा ठोस पुरावा आहे. काँग्रेसने देशाच्या नेतृत्वात विविधतेचा आदर राखत दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि महिलांना अग्रस्थान दिले आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने सामाजिक समतेच्या मूल्यांना सदैव हिणवले. सपकाळ यांनी संघाच्या नेतृत्वात आजवर कधीही अल्पसंख्याक, महिला किंवा दलित व्यक्तीला स्थान न मिळाल्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडत भाजपाचा फोलपणा उघड केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व गेल्या 11 वर्षांपासून देश अनुभवत आहे. परंतु या काळात देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक विघटनाचे प्रमाण वाढले आहे. तीन तलाक, वक्फ बोर्ड, NRC आणि CAA सारख्या विषयांवरून अल्पसंख्यांक समाजात भीतीचे वातावरण पसरवण्यात आले. शेतकरी, बेरोजगार तरुण आणि बहुजन समाज यांच्या जीवनात फारसा सकारात्मक बदल झाला नाही. सपकाळ यांनी हे स्पष्टपणे दाखवून दिलं की, मोदी सरकारने केवळ घोषणांची आतषबाजी केली आहे. प्रत्यक्षात बहुजन समाजाच्या समस्या सोडवण्याचे कोणतेही ठोस प्रयत्न केलेले नाहीत.
Parinay Fuke : संविधानाचे वारसदार आंबेडकर स्मारकाच्या लोकार्पणासाठी पुढे
संविधान रक्षणाची जबाबदारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा राजकीय वापर करणाऱ्यांनी त्यांच्या विचारांची सदैव पायमल्ली केली आहे. रा. स्व. संघाचे बाबासाहेबांच्या संविधानाविषयीचे विरोधी विचार, रामलीला मैदानावर संविधान जाळल्याची घटना आणि दलितांवर वाढलेले अत्याचार यावरून भाजपाच्या दोन्ही मुखवट्यांचा खरा चेहरा स्पष्ट होतो. हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, भारताची परंपरा सर्व धर्म समभाव आणि आतां विश्वात्मके देवे या ज्ञानेश्वरी तत्वज्ञानात आहे. याच तत्वज्ञानाशी एकरूप राहून काँग्रेसने देशाची वाटचाल घडवली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य हे सामाजिक न्यायाच्या लढ्याला दिशा देणारे आहे. संविधानावर होणाऱ्या आघातांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी सजग आणि सज्ज नेतृत्वाची भूमिका स्वीकारली आहे.आजच्या राजकीय धूसरतेच्या काळात, हर्षवर्धन सपकाळ यांचे हे भाष्य नव्या राजकीय वैचारिक लढाईस प्रारंभ करणारे ठरले आहे. यामुळेच ते आजच्या काळातील संविधानवादी आणि समतावादी विचारसरणीचे प्रमुख चेहरा म्हणून उदयास येत आहेत.