
महाराष्ट्राचा 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर झाला. सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तर विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प दिशाहीन, ध्येयहीन आणि धोरणविहीन आहे. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेने सरकारकडून मोठ्या आशा बाळगल्या होत्या. त्या पूर्ण करणे दूरच, सरकारने लोकांची फसवणूकच केली आहे. निवडणुकीपूर्वी गाजावाजा करून दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. प्रत्यक्षात सामान्य जनतेला कोणताही ठोस लाभ मिळणार नाही. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा धोका निर्माण झाला असून महाराष्ट्रावर तब्बल आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढत चालला आहे आणि सरकार बेफामपणे राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Maharashtra Budget Session : क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांचा संताप अन् आंदोलनाचा इरादा
मोफत वीजही फसवी
सपकाळ म्हणाले, राज्यातील लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. पण सरकारने कर्जमाफीबाबत एकही शब्द उच्चारलेला नाही. शेतमालाच्या हमीभावाबाबतही कोणतीही ठोस घोषणा नाही. मोफत वीज देण्याचे गाजर दाखवण्यात आले. पण प्रत्यक्षात आजही वीजबिलांच्या थकबाकीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या जात आहेत.
सरकारने शेतकरी सन्मान निधीत वाढ करू असे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात त्यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. कृषी क्षेत्रामुळे राज्याच्या विकास दरात वाढ झाली. परंतू सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला नाही. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
राज्यातील आर्थिक परिस्थिती पाहता, महाराष्ट्र कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने राज्य आर्थिक संकटात सापडले आहे. या भ्रष्टाचारी सरकारमुळे महाराष्ट्र दिवाळखोरीत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. महाराष्ट्र आता थांबणार नाही. भाजपा-शिंदे सरकारने राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावण्याचा डाव रचला आहे. मात्र जनता आता जागी झाली आहे. या सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
Ladki Bahin : निवडणुकीपूर्वी योजना राबवा, सत्ता येताच पंधराशेतच भागवा
लाडक्या बहिणींना फसवले
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महिलांसाठी “लाडकी बहिण योजना” सुरू करून सरकारने मोठे गाजावाजे केले. मात्र आजच्या अर्थसंकल्पातून दोन हजार 100 रुपये देण्याच्या अपेक्षेने बसलेल्या लाखो भगिनींना सरकारने निराश केले आहे. योजनेतून जवळपास 10 लाख महिला वगळण्यात आल्या, हा मोठा विश्वासघात आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्याच्या नावाखाली सरकारने केवळ घोषणा करून त्यांची फसवणूक केली आहे.
हा अर्थसंकल्प पाहता, राज्याचा विकास फक्त मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नाशिकपुरता मर्यादित राहणार आहे. भुयारी मार्ग, मेट्रो, उड्डाणपूल आणि विमानतळ यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण राज्यातील ग्रामीण भाग पूर्णतः उपेक्षित राहिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील विकासाबाबत सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. राज्यातील जिल्ह्यांचे आर्थिक चित्र पाहता, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या काही जिल्ह्यांव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्राची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. पण अर्थसंकल्पात त्यावर कोणतीही उपाययोजना नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली.
बेरोजगारी वाढणार
सरकारवर हल्ला चढवत सपकाळ म्हणाले, उद्योग आणि रोजगाराच्या आघाडीवरही हा अर्थसंकल्प सपशेल अपयशी ठरला आहे. राज्यातील बेरोजगारी वाढत असून सरकारकडे कोणतीही ठोस उपाययोजना नाही. 50 लाख रोजगार निर्मितीचे आश्वासन फसवे. हे आकडे केवळ कागदावरच राहणार. राज्यातील बेरोजगार युवकांना संधी मिळण्यासाठी कोणतेही नवीन प्रकल्प जाहीर झाले नाहीत. परकीय गुंतवणूक फक्त वित्तीय क्षेत्रात येत आहे, औद्योगिक क्षेत्रात नाही. ही चिंताजनक बाब आहे. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा कट आहे. समृद्धी महामार्गाने कोणाची समृद्धी झाली? हे सर्वांनाच माहीत आहे. सरकार त्या लोकांचीच पुन्हा समृद्धी करण्यासाठी आपली ताकद वापरत आहे, असा घणाघात सपकाळ यांनी केला.
अर्थसंकल्प सादर करताना सरकारने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक अद्याप सुरू झाले नाही. हे सरकार आग्र्यात स्मारक उभे करण्याच्या तयारीत आहे. संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा झाली. परंतू त्यांच्याच अपमान करणाऱ्या कोरटकर, सोलापूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.