महाराष्ट्र

Congress : हिंदीचा भाषिक बॅलेस्टिक, माय मराठीवर सांस्कृतिक स्ट्राईक

Harshwardhan Sapkal : भाषा झाली राजकीय रणशिंग

Author

राज्य सरकारच्या तिसऱ्या भाषा धोरणावरून आता काँग्रेसनेही थेट मैदानात उडी घेतली आहे. मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्या या निर्णयाचा काँग्रेसने तीव्र शब्दांत विरोध करत भाजपवर महाराष्ट्रद्रोहाचा आरोप केला आहे.

राज्याच्या शिक्षण धोरणात करण्यात आलेल्या एका निर्णयामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. मराठी अस्मिता, मातृभाषेचा अभिमान आणि सांस्कृतिक ओळख यावर पुन्हा एकदा घाला घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शिवसेना आणि मनसेसारख्या पक्षांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने मराठीसाठी आवाज उठवला असतानाच आता काँग्रेसनेही उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात हलचल निर्माण झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारच्या तिसरी भाषा धोरणावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सपकाळांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप करत, “फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा खुपसून घातला आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Maharashtra : हिंदी आता ऐच्छिक, शब्दांचं आकाश मोकळं

काँग्रेसचे आरोप

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार, इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच इतर भाषा निवडण्याची संधी देण्यात आली असली तरी, कमीतकमी 20 विद्यार्थ्यांची अट ही मराठी विरोधी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. सपकाळ म्हणतात, सरकारचा जीआर पाहिला तर स्पष्ट होते की, ही निवड नाही, ही सक्ती आहे. इतर भाषा शिकवायच्या असतील तर त्या वर्गात 20 विद्यार्थी हवे, म्हणजेच पर्यायाचं खोटं भासवणं आणि हिंदी लादण्याचा भाजपचा कट आहे!”

त्यांनी पुढे भाजपवर जोरदार घणाघात करत सांगितलं की, ‘एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती’ हा संघ-भाजपचा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावरच उठलेला आहे. हा अजेंडा फडणवीस-शिंदे-अजित पवारांच्या माध्यमातून अमलात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण खातं शिंदे गटाकडे असून, त्यांच्या हातूनच हा मराठी विरोधी निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेणाऱ्या शिंदे गटानेच आता मराठीच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

Prataprao Jadhav : मोदींच्या विजयाचे गोपनीय भागधारक शरद पवार

सत्ताधाऱ्यांचं अजेंडा

सपकाळांनी अजित पवारांवरही थेट टीका करत म्हटलं, त्यांना ना मराठीशी देणंघेणं, ना महाराष्ट्राशी. सत्तेसाठी अर्थखातं मिळवणं हीच त्यांची प्राथमिकता आहे. दिल्लीश्वरांशी निष्ठा ठेवून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा बळी देणं हे या सत्ताधाऱ्यांचं अजेंडा आहे. मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा हिंदी लादण्याचा डाव हाणून पाडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असं सडेतोड आव्हानही सपकाळांनी दिलं.

राज्यात यापूर्वीही मराठीच्या मुद्द्यावरून अनेकदा रणकंदन झाले, पण आता काँग्रेसने उघडपणे मैदानात उतरल्याने ही लढाई आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. भाजपचा मराठी माणसावरचा अजेंडा उघड करणं, आणि शालेय स्तरावरच हिंदीची सक्ती थोपवणं, हाच काँग्रेसचा मुख्य अजेंडा असल्याचं स्पष्ट दिसतंय. मराठी माणूस, मराठी शाळा आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी आता लढाई पुन्हा रंगणार. पण या लढाईत कोण टिकेल आणि कोण टिकवेल माय मराठीचं अस्मितामान? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Nitin Gadkari : पंधरा ऑगस्टपासून फास्टॅग फ्रीडम

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!