शरदचंद्र पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना भेटून पर्यटन आणि रोजगार संबंधी चर्चा केली.
काटोल तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या बोर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा व जैवविविधता आहे. हे वनपरिसर पर्यटनदृष्ट्या अधिक विकसित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन धोटीवाडा येथून जंगल सफारी सुरू करण्याची मागणी केली आहे. अनेक स्थानिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बोर अभयारण्यात वाघ, बिबट्या, हरिण, निलगाय, अस्वल यांसारखे वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आढळतात. अनेक दुर्मिळ पक्ष्यांचेही हे महत्त्वाचे आश्रयस्थान आहे. या ठिकाणी जंगल सफारी सुरू झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल. धोटीवाडा व परिसरातील नऊ गावे बोर अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येतात. त्यामुळे येथील रहिवाशांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून नवे रोजगार मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर सलील देशमुख यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना भेटून या प्रस्तावास पाठिंबा देण्याची विनंती केली.
शेतीचे नुकसान
संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. बोर अभयारण्य आणि इतर जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात निलगाय, रोही, रानडुक्कर व बिबट्या यांचा संचार वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसानही होत आहे. सलील देशमुख यांनी या समस्येला गाभ्यापर्यंत जाऊन समजून घेतले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काटोल तालुक्यातील तपणी येथे रघवी समाजाचे एक महत्त्वाचे देवस्थान आहे. येथे दरवर्षी मोठे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र, जागेच्या कमतरतेमुळे अनेक अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर या देवस्थानला लागून असलेली वनजमीन देवस्थानला मिळावी, यासाठीही सलील देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी या संदर्भात त्यांनी चर्चा केली असता, सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
लवकरच या मागणीला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. सलील देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे पर्यटन, शेतकरी आणि धार्मिक स्थळांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतले जातील, अशी आशा व्यक्त होत आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन विभागाला नवी चालना आणि गरजूंना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे.
