महाराष्ट्र

Akola Shiv Sena : शिंदे गट प्रेझेंट्स – नियुक्ती कर, गोंधळात भर 

Gopikishan Bajoriya : आधी जाळला पुतळा, आता कार्यपद्धतीवर बॉम्ब 

Share:

Author

अकोल्यात एकनाथ शिंदे गटात नेमणुकीच्या नावावर गोंधळाचा महामेळा भरला आहे. जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर पक्षातूनच जोरदार टीका होत असून कार्यकर्त्यांनी थेट बंडाची भूमिका घेतली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील शिंदे गटात सध्या राजकीय तापमान प्रचंड वाढले आहे. वातावरण अक्षरशः चित्रविचित्र बनले आहे. माजी आमदार आणि जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा पक्षातीलच कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. याआधी त्यांच्या विरोधात पुतळा जाळण्याची घटना घडली होती आणि आता पुन्हा आरोपांच्या फैरी झडत आहेत. मूर्तिजापूर उपजिल्हाप्रमुख ललित वानखेडे यांनी बाजोरिया यांच्यावर थेट गंभीर आरोप करत ‘संपर्क नव्हे, संशयप्रमुख’ अशी उपमा देत पक्षवाढीला खिंडार घालणारे धोरण असल्याचं ठणकावलं आहे.

शिवसेना शिंदे गटात पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्ती आणि अनधिकृत आदेशांवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हाप्रमुख ललित वानखेडे यांनी बाजोरिया यांच्यावर पक्षाच्या अंतर्गत व्यवस्था ध्वस्त करण्याचा ठपका ठेवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यांच्या सोबत तालुकाप्रमुख दीपक दांदळे, शहरप्रमुख गौरव मोरे, तसेच अन्य प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

बाजोरिया यांचे वादग्रस्त आदेश

वानखेडे यांचे म्हणणे आहे की, गेली तीन वर्षे बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारसरणीवर काम करणाऱ्या शिवसैनिकांना बाजोरिया सहकार्य देण्याऐवजी अडथळा निर्माण करत आहेत. कार्यक्रम कशाला? फोटो नको, असे म्हणत कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अकोल्यासाठी दिलेला विशेष विकास निधी सामान्य शिवसैनिकांऐवजी बाजोरिया यांनी विरोधकांच्या फायद्यासाठी वापरल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. पक्षविरोधी काम करणे, कार्यकर्त्यांना डावलणे आणि हितसंबंध जोपासणे, अशा सर्व गोष्टींमुळे कार्यकर्त्यांमध्ये रोषाची लाट पसरली आहे.

कार्यकर्त्यांचा आक्षेप

वानखेडे यांनी स्पष्टपणे सांगितले की शहरप्रमुख व तालुकाप्रमुखांच्या नियुक्त्या मुंबईतील बाळासाहेब भवनकडूनच होतात. मात्र 3 जून रोजी झालेल्या फेरनियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. बाजोरिया यांनी पक्षाच्या अधिकाराचा गैरवापर करत वैध प्रक्रिया धाब्यावर बसवल्याचे मत कार्यकर्त्यांनी मांडले. रामनगर येथील काळ्या मारुती मंदिराची जमीन बळकावण्यासाठी बाजोरिया यांनी शिवसैनिकांचा वापर केला, असा धक्कादायक आरोप नागरिकांनी लेखी तक्रारीद्वारे केला आहे. कार्यकर्त्यांनी सांगितले की, अशा अनेक तक्रारी त्यांच्या पर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यावर चौकशीची गरज आहे.

Ravindra Chavan : अनुशेषाच्या अंधारातून विकासाचा सूर्य उगवतोय 

उपमुख्यमंत्र्यांना साकडे

या सर्व पार्श्वभूमीवर ललित वानखेडे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण त्यांच्यासमोर मांडले जाईल. शिवसेना ही निष्ठेवर उभी आहे, व्यक्तीपूजेमुळे नाही, असे वानखेडे म्हणाले. बाजोरिया यांच्या जागी नव्या संपर्कप्रमुखाची नियुक्ती करावी, अशी कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी आहे. पक्षाची गाडी योग्य मार्गावर नेण्यासाठी, आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी, उच्चस्तरावर निर्णय घेणे आता अनिवार्य झाले आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, बाजोरिया यांच्यावर कार्यकर्त्यांचा वाढता दबाव हे शिंदे गटासाठी एक मोठं आव्हान ठरू शकतं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अंतर्गत वाद शमवणे आता पक्ष नेतृत्वासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे. संपर्काची जबाबदारी विश्वासाने निभावली पाहिजे, अन्यथा कार्यकर्त्यांच्या संयमाची परीक्षा महागात पडू शकते, अशा शब्दात मूर्तिजापूरच्या मातीतील शिवसैनिकांचा आक्रोश आता उफाळून आला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!