महाराष्ट्र

Akola Politics : बाजी मारणार पठाण की भाजप टिकवणार सन्मान ?

Local Body Elections : अकोल्यातील लढाई आता अस्तित्वाची झालीय 

Author

अकोल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. एकीकडे काँग्रेसचे साजिद खान पठाण मजबूत पावलं टाकत आहेत, तर दुसरीकडे भाजपला आपली प्रतिष्ठा आणि अस्तित्व वाचवण्याची लढाई लढावी लागत आहे.

अकोल्यातल्या राजकीय पटलावर सध्या तापलेलं राजकारण म्हणजे जणू काही वादळापूर्वीचं गूढ शांततेसारखं आहे. एकीकडे सत्ता टिकवण्याची भाजपची धडपड. दुसरीकडे काँग्रेसचा जोर पकडणारा झंझावात, अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनं खऱ्या अर्थानं राजकीय भूकंपाची चिन्हं दाखवली आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात येऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही जिल्ह्यात येऊन विकास कामांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना झापले. दोघांची धडपड, सभा, दौरे, झपाट्याने सुरू असलेल्या बैठकांची मालिका, हे सर्व पाहता अकोल्यात निवडणुकीचे वारे किती जोरात वाहू लागले आहेत, याचा अंदाज सहज येतो. महायुतीला अकोल्यात पकड घट्ट करायची आहे, पण वास्तव काय सांगतं?

काँग्रेस आमदारांचा दबदबा

अकोल्यात सध्या काँग्रेस पक्षाचे आमदार साजिद खान पठाण हे केंद्रस्थानी आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ जिंकून त्यांनी केवळ निवडणूकच जिंकली नाही, तर काँग्रेसमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसचा डाव पूर्णपणे साजिद खान यांच्या डावपेचांवर अवलंबून राहणार, असे स्पष्ट होत आहे. आगामी महापौरपदासाठीही काँग्रेस जर निवडणूक जिंकली, तर अंतिम नाव साजिद खान पठाणच ठरवणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशा घडामोडींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.

बालेकिल्ल्यात ताण 

भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा अकोला पश्चिम मतदारसंघ सध्या हळूहळू काँग्रेसच्या ताब्यात जाताना दिसतो आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव पचवलेला भाजप, आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही पिछाडीवर गेला तर तो थेट राजकीय अस्तित्वाच्या संकटात जाईल, अशी परिस्थिती आहे. अंदरमहालातही भाजपमध्ये तणाव वाढला आहे. कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असून नेतृत्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. जनतेमध्येही भाजपबद्दल नाराजी आहे. यामुळे भाजपपुढे अकोल्यात नव्याने नेतृत्व उभं करून पक्ष पुन्हा बांधण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

Akola : अधिकाऱ्यांच्या बैठकीत दादांचा उडाला भडका!

शिवसेनेतील संभ्रम, राष्ट्रवादीतले वळण

महायुतीतील घटक पक्षांमध्येही अकोल्यात चांगलाच संभ्रम दिसून येतोय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्याबद्दल महाविकास आघाडीशी जवळीक असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी आणखी चिंतेचा विषय ठरू शकतात. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर मदन भरगड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे वळल्याची जोरदार चर्चा आहे. आपली डाळ शिजवायची या राजकीय गणितांमुळे पक्ष बदलाची रणनीती आखली जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिष्ठेची लढत 

या निवडणुकीत विजय हे केवळ सत्तेचे द्योतक राहिले नाही, तर ती प्रत्येक पक्षासाठी आपली राजकीय ओळख टिकवण्याची निर्णायक लढाई ठरणार आहे. काँग्रेसने जर अकोला महानगरपालिकेत यश मिळवलं, तर विधानसभा पाठोपाठ महापालिका जिंकणारा साजिद खान यांचा चेहरा राज्यस्तरावर झळकू शकतो. तर दुसरीकडे, भाजपसाठी हा पराभव म्हणजे अकोल्यातील अस्तित्वाला प्रश्नचिन्ह लागण्यासारखा धक्का ठरणार.

रणसंग्राम रंगतदार

अकोल्याच्या रस्त्यांवर सध्या सभा, मेळावे, रणनीतींचा गजर आहे. राजकीय नेत्यांच्या गाड्या ये-जा करत आहेत, पक्षांतराच्या चर्चांनी रंगत वाढवली आहे. पण अंतिम निर्णय मात्र जनतेचाच आहे. अकोल्याच्या मतदारांनी कुणाच्या गळ्यात विजयी हार घालावी, याचा निर्णय जर काँग्रेसकडे झुकला, तर भाजपसाठी ही निवडणूक एक गंभीर इशारा ठरू शकते. तर… सत्ता कुणाची? या प्रश्नाचं उत्तर लवकरच जनतेच्या बोटांमध्ये उमटणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!