
राज्यात पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग आणि आउटगोइंग सुरू आहे. आता यवतमाळ येथून काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस मधील माजी आमदारांसह अनेक आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
उमरखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि विजय खडसे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा शनिवारी उमरखेड येथे पार पडला. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षावर नाराज असलेल्या या नेत्यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
विधानसभा निवडणुकीदरम्यानच काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी निर्माण झाली होती. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ होते. स्थानिक नेत्यांकडून होणाऱ्या गळचेपीमुळे अखेर पक्षाला रामराम करत असल्याचे माजी आमदार विजय खडसे यांनी स्पष्ट केले.

पद नको, सन्मान हवा
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. आम्हाला पद नको, पण योग्य तो सन्मान मिळायला हवा. आगामी नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देऊ,” असा विश्वास दोन्ही माजी आमदारांनी व्यक्त केला.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नेत्याला पक्षात योग्य सन्मान दिला जाईल,” असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. उमरखेडचे विद्यमान आमदार किसन वानखेडे यांनी तालुक्यातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. त्यावर सकारात्मक उत्तर देत बावनकुळे यांनी या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार संजय कुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार उत्तमराव इंगळे, नामदेव ससाने, आरती फुपाटे, सुदर्शन रावते, महेश काळेश्वरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ताकदवान प्रवेश
या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि विजय खडसे यांच्यासह माजी सभापती कृष्णा पाटील देवसरकर, माजी नगराध्यक्षा भावना उदावंत, बालाजी उदावंत, रमन रावते, बाळु सेठ भट्टड, विजय हरडफकर, किशोर वानखेडे, साहेबराव कदम हिवरेकर, जगदीश नरवाडे, माधव वैध, रमेश आडे आदींनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शिवसेनेत अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील नेते दाखल होत आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रभावशाली नेते ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
शिवसेना-भाजप युती मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजपही आपल्या विस्तार धोरणावर भर देत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील असंतुष्ट नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून स्थानिक पातळीवर पकड मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. उमरखेडमधील हा पक्षप्रवेश त्याचाच एक भाग असल्याचे स्पष्ट दिसते.
राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युतीची तयारी सुरू असून, विरोधकांना मोठा धक्का देण्याची रणनीती आखली जात आहे.