
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळ उडवून दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियावरून केला आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात दलित आणि मुस्लिम कार्यकर्त्यांना भडकविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. बीडमध्ये काढण्यात आलेला मोर्चा सुनियोजित कट होता, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड आणि एका कार्यकर्त्याची चॅटिंगचा स्क्रिनशॉट ट्विट करीत मिटकरी यांनी खळबळ उडवून दिली आहे. बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी सुपारी देण्यात आल्याची टीका आमदार मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यकर्त्याला या मोर्चात दलित आणि मुस्लिम लोकांना गोळा करण्याचे आदेश दिल्याचं मिटकरी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. आपल्या पोस्टमध्ये मिटकरी यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांनाही टॅग केलं आहे. चॅटिंगची सतत्या जनतेपुढं आणावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरपंच संतोष यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Beed मधील मोर्चा सुनियोजित
आमदार मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही आव्हाड यांच्या चॅटिंगचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड बीडमधील मोर्चासाठी आपल्या शिवराज नावाच्या कार्यकर्त्याला उद्याचा मसाला रेडी ठेव. मुंडे आणि वाल्मिक कराड विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा करण्याचे सांगत असल्याचे दिसते. जितेंद्र आव्हाड यांनीही या स्क्रीनशॉट विरोधात आपली भूमिका मांडली आहे. बीड मधील भाषणाने धनंजय मुंडेचे कार्यकर्ते फार बिथरले आहेत. त्यांना सत्य पचेनासे झालं आहे. त्यामुळं त्यांनी खोटे स्क्रिनशॉट तयार केल्याचा आरोप आमदार आव्हाड यांनी केला आहे.
आपल्या क्रमांकाचा बनावट हा स्क्रीनशॉट कोणी बनवला, त्याची पाळेमुळे शोधून काढा, अशी माझी सायबर पोलिसांकडे तक्रार असल्याचे आव्हाड म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येविरोधात बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. सर्वपक्षीय मोर्चामध्ये बोलताना सर्व पक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करण्यात आली. मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद सुद्धा देऊ नये, अशी मागणी देखील करण्यात आली. वाल्मीक कराडचा वाल्या झाल्या आहे. वंजारी समाजाच्या अनेक नेत्यांची हत्या झाली. अशोक सोनवणे यांची तक्रार घेतली नाही. वेळीच गुन्हा दाखल केला असता, तर देशमुखांची हत्या झाली नसती, असेही आव्हाड म्हणाले.