महाराष्ट्र

मशाल पेटवूनही ठाकरेंचा पक्ष अंधारातच

गटबाजीला कंटाळून Jitendra Janawale शिंदे गटात शामिल

Author

मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटात सातत्याने मोठ्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे बाहेर पडण्याचे सत्र सुरू आहे.
पक्षाच्या बळकटीसाठी झगडणाऱ्या उद्धव ठाकरेंना वारंवार धक्के बसत आहेत. शिवसेना शिंदे गटाने बंडखोरी करून वेगळी सत्ता स्थापन केल्यापासून, उद्धव गटाला सातत्याने गळतीचा सामना करावा लागत आहे. आता आणखी एक धक्का बसला असून मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

विशेष म्हणजे जानावळे हे कडवट शिवसैनिक असूनही त्यांनी उद्धव ठाकरेंचा त्याग करत पक्षाला रामराम ठोकला आहे. सध्या हे प्रकरण चर्चेत आहे. हे प्रकरण केवळ एका नेत्याच्या राजीनाम्यापुरते मर्यादित नाही, तर यामुळे ठाकरे गटाच्या अंतर्गत धुसफुशीतून पुढे येणाऱ्या विसंवादाचा अंदाज बांधता येतो. ज्या पक्षाने एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणावर निर्विवाद सत्ता गाजवली, तो पक्ष आता दुबळा आणि अराजकतेच्या दिशेने जात असल्याचा आरोप होत आहे.

संत्रा मोसंबी उत्पादकांसाठी Ashish Deshmukh सरसावले

 

अनिल परब यांच्यावर आरोप

जितेंद्र जानावळे यांनी आपल्या राजीनाम्यात स्पष्टपणे उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षात असताना त्यांची सातत्याने गळचेपी करण्यात आली. विशेषतः अनिल परब यांनी त्यांना कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवत त्यांच्या राजकीय कारकीर्दीची वाढ खुंटवली. जानावळे यांच्या दाव्यानुसार, मागील सहा वर्षांपासून त्यांना संघटनात्मक कामांपासून दूर ठेवण्यात आले होते.

गेल्या पालिका निवडणुकीत मी भाजपच्या विरोधात लढलो, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिलो. थोड्या मतांनी हरलो, पण संघटनात्मक काम सुरूच ठेवले. मात्र, अनिल परब यांनी मला विधानसभेच्या बाहेर ठेवले. वारंवार विनंती करूनही केवळ तारीख देत माझी राजकीय गळचेपी केली गेली, असे जानावळे आपल्या राजीनाम्यात म्हणतात.

योजना On Paper, पण पैसे मात्र गोठले

 

शिवसैनिक असुरक्षित

शिवसेना ठाकरे गटात सध्या गटबाजीचे वाद सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. अनेक कट्टर शिवसैनिकांना पक्षात स्थान दिले जात नाही, तर काही विशिष्ट नेत्यांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप आहे. जानावळे यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊनही त्यांना न्याय मिळाला नाही, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

संघटनेत जी चुकीची पद्धत सुरू आहे, त्याला मी कंटाळलो आहे. मी संघटनेसाठी रस्त्यावर उतरून लढलो, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, कोर्टात केसेस झेलल्या, पण पक्षाने माझ्या निष्ठेचा कधी विचार केला नाही. उलट, राजकीय हेतूने मला डावलण्यात आले, असा थेट आरोप जानावळे यांनी केला आहे.
यावरून स्पष्ट होत आहे की, पक्षात अंतर्गत दबाव आणि पक्षश्रेष्ठींना निवडक नेत्यांनाच महत्त्व देण्याचा फटका अनेक कार्यकर्त्यांना बसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याची भावना बळावत चालली आहे.

पुलगावला जाणारा रस्ता मुंबई Mantralaya मध्ये अडकला

 

ठाकरेंचा वारसा संपतोय

गेल्या काही महिन्यांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) मधून अनेक मोठे नेते आणि पदाधिकारी बाहेर पडले आहेत. राजन साळवी यांसारखे माजी आमदार थेट शिंदे गटात गेले. आता शिवसेनेतील तळागाळातील कार्यकर्तेही पक्ष सोडत आहेत. याचा अर्थ गटाच्या संघटनात्मक पातळीवर मोठी घसरण झाली आहे.

एकेकाळी शिवसेना ही कडवट हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचे प्रतिक मानली जात होती. मात्र, आज परिस्थिती अशी आहे की, या पक्षातील नेत्यांनाही स्वतःच्या भविष्यासाठी दुसरे पर्याय शोधावे लागत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकेकाळी मशाल हे ठाकरे गटाचे शक्तीचे प्रतीक होते, मात्र आता ही मशाल मंदावत चालली आहे का, असा सवाल विचारला जात आहे. जितेंद्र जानावळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आणखी काही नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरे गटाच्या भविष्यासाठी ही गळती किती मोठा धोका ठरेल, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!