नागपुरातील परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 23 मार्च दुपारी तीननंतर शहरातील संचारबंदी संपूर्णपणे उठवण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन मोठी खदखद दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात उसळलेल्या हिंसेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. या हिंसाचारामुळे फक्त नागपूरच नव्हे, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली, आणि काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. अकोला आणि इतर जिल्ह्यांमध्येही सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
हल्ल्यानंतर परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत असून नागपुरात स्थिरता परतण्याच्या मार्गावर आहे. नागपुरातील परिस्थिती सुधारत असल्याने, प्रशासनाने 23 मार्च रोजी दुपारी तीन वाजल्यापासून शहरातील संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्च रोजी शहरातल्या अनेक ठिकाणी संचारबंदी हटविण्यात आली होती होती. मात्र काही भागांत संचारबंदी कायम होती.
फडणवीसांची बैठक
नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल यांनी जाहीर केल्यानुसार, नागपूरमधील कोतवाली, तहसील, गणेशपेठ आणि यशोधरानगर पोलीस स्टेशन परिसरातील संचारबंदी आज दुपारी तीन वाजल्यापासून पूर्णपणे उठवण्यात येणार आहे. आतापर्यंत या भागांत संचारबंदी लागू होती. मात्र हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी 22 मार्च रोजी नागपूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. सोमवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये संचारबंदी लागू केली होती. मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Devendra Fadnavis : नव्या कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय आरोग्य सेवा केंद्र सज्ज
हिंसाचाराचा उद्रेक
औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे आधीच तापलेल्या राजकीय वातावरणात, नागपुरात सोमवारी मोठा तणाव निर्माण झाला. हिंसक जमावाने पेट्रोल बॉम्ब फेकले, दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान घडवले. या हिंसाचाराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यामुळे शहरात अधिक दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी याप्रकरणी त्वरित कारवाई करत अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपुरात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि स्पष्ट निर्देश दिले की, या हिंसाचारामुळे झालेले नुकसान आरोपींकडून वसूल केले जाईल.
सुरक्षेचे कठोर उपाय
दंगलीदरम्यान पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले होते. अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गंभीर जखमी झाले. पोलीस महिलांवरही वार झाले असल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे पोलिस दल अधिक आक्रमक होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते.
राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. नागपुरातील अशांततेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कठोर उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 22 मार्च रोजी नागपूर दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला, तर आज ते नाशिक दौर्यावर आहेत. प्रशासनाच्या कठोर उपाययोजनांमुळे शहरातील शांतता लवकरच पूर्णतः पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे.
