
नागपूर दंगलीप्रकरणात अझीजुल निजानुल रहमान या बांगलादेशी व्यक्तीचे नाव समोर आले आहे. तो बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याचा आरोप आहे.
उपराजधानीत 17 मार्च रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर नवनवीन वळणे घेत घटनाक्रम अधिक गहिरा होत आहे. या हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोजर लावण्याची कारवाई सुरू केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करत ही कारवाई थांबवली. दरम्यान, या घटनेचा आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. एका बांगलादेशी नागरिकाला भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीचा हिंसाचारात सहभाग होता का, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने दादर येथून अझीजुल निजानुल रहमान या बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. तो रोजंदारीवर काम करणारा एक सामान्य मजूर असल्याचे सांगितले जात आहे, मात्र पोलिसांना संशय आहे की, नागपुर हिंसाचारात त्याचा काहीतरी हातभार असू शकतो. रहमानने बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्ड मिळवल्याची कबुली दिली आहे. त्याच्या मोबाईल फोन फोन सीडीआरच्या मदतीने पोलिस तपास करत आहेत. नागपूर पोलिसांनाही या अटकेची माहिती देण्यात आली आहे.

अफवेने पेटली हिंसा
संपूर्ण वाद धार्मिकदृष्ट्या संवेदनशील चादरच्या अफवेने पेटला. 17 मार्च रोजी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विहिंप आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरू होती. यादरम्यान, एका पवित्र शिलालेख असलेल्या चादरीला जाळण्यात आल्याची अफवा पसरली आणि यामुळे नागपूरमध्ये परिस्थिती चिघळली. संतप्त जमावाने तोडफोड करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अटकेची मोहीम राबवली आणि आतापर्यंत 110 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेने या हिंसाचारात सामील काही आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालवण्याची योजना आखली होती. यामध्ये प्रमुख आरोपी फहीम खान आणि हाफिज नसीम शेख यांच्या घरांचा समावेश होता. मात्र, संबंधित आरोपींनी न्यायालयात धाव घेत या कारवाईवर स्थगिती मिळवली. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला की, ही कारवाई सूडबुद्धीने केली जात आहे. परिणामी, पुढील सुनावणी होईपर्यंत बुलडोजर कारवाई स्थगित करण्यात आली आहे.
तपास सुरूच
नागपूर हिंसाचार प्रकरण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. संशयित बांगलादेशी नागरिकाच्या सहभागाची खातरजमा करण्यासाठी पोलिस चौकशी करत असून, त्याच्या मोबाईल लोकेशनचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. तसेच, अटक करण्यात आलेल्या 110 पेक्षा अधिक आरोपींवर कायदेशीर प्रक्रिया कशी चालणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या हिंसेमुळे नागपुरतं तणावाचे माहोल होते. अनके लोकांच्या व्यवसायावरही यामुळे परिणाम झाला आहे. नागपूर शहर अजूनही या घटनेच्या परिणामांशी झुंजत आहे.