महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येत असताना, पक्षांतरांची मालिका सातत्याने सुरू आहे. अशातच पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. रणनीती आखणे, बैठका घेणे आणि मोर्चेबांधणी यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. पण या सगळ्या गडबडीत पक्षांतराचा खेळही तितक्याच ताकदीने खेळला जात आहे. विशेषतः पूर्व विदर्भात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला एक जबरदस्त धक्का बसला आहे. ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या धक्क्याचे केंद्र आहे तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती नंदु राहंगडाले.
शरदचंद्र पवार गटाचे कट्टर समर्थक आणि माजी आमदार चरण वाघमारे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे नंदु राहंगडाले यांनी अचानक तुतारीचा नाद सोडला आणि अजित पवार यांची घड्याळ हाताला बांधली. मुंबईत खासदार प्रफुल पटेल आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश शरद पवार गटासाठी एखाद्या राजकीय भूकंपापेक्षा कमी नाही. कारण नंदु राहंगडाले हे चरण वाघमारे यांच्यासोबत अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने काम करत होते. मागील निवडणुकीत नंदु राहंगडाले यांनी चरण वाघमारे यांच्यासाठी जीव ओतला होता.
पक्षांतराचा मोठा परिणाम
रहांगडाले यांनी गावोगावी मोर्चे बांधले, रणनीती आखली आणि प्रत्येक श्वास चरण वाघमारे यांच्या विजयासाठी घेतला. पण आता, काहीतरी अनपेक्षित घडले, ज्यामुळे नंदु राहंगडाले यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या गटात उडी घेतली. हा निर्णय त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेचा परिणाम आहे की राजकीय रणनीतीचा भाग, यावर चर्चा रंगत आहे. या पक्षांतराने शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण नंदु राहंगडाले हे गटाचे एक विश्वासू कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने तुमसर परिसरात शरद पवार गटाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे.
आधीच महाविकास आघाडीच्या सत्तेची गाडी संथ गतीने चालत असताना, शरद पवार गटात कार्यकर्त्यांची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत नंदु राहंगडाले यांच्यासारख्या नेत्यांचे पक्षांतर गटासाठी मोठा झटका आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत शरद पवार गटाला हा धक्का पचवणे सोपे जाणार नाही. शरदचंद्र पवार गट आता कठीण परिस्थितीत आहे. कार्यकर्त्यांची संख्या कमी असताना आणि नेते पक्ष सोडून जात असताना, गटाला आपली ताकद पुन्हा मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. निवडणुकीच्या या रणसंग्रामात शरद पवार गट नव्या जोमाने लढेल की हा धक्का त्यांना मागे खेचेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Prakash Ambedkar : सरकारच्या चालढकलपणावर न्यायालयाचा जोरदार हल्ला