
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासनाला अन्न परवाना तपासणी, औषध पुरवठा नियंत्रण आणि दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
विदर्भ हा महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग, पण गेली कित्येक दशके विकासाच्या स्पर्धेत मागे पडलेला प्रदेश. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, अपुऱ्या सुविधा आणि बेरोजगारीचा आलेख हा कायम वरचाच राहिला. उद्योगधंद्यांची कमतरता, मूलभूत सुविधांचा अभाव आणि शासनाच्या फक्त घोषणांपुरत्या मर्यादित आश्वासनांनी विदर्भाला सतत दुय्यम स्थान दिलं. पण आता परिस्थिती झपाट्याने बदलते आहे.
विधानसभा निवडणूक 2024 जणू काही महाराष्ट्र आणि विदर्भासाठी जीवसंजीवनी ठरली. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली आणि सर्वांचे लाडके देवाभाऊ राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. विदर्भाचा सुपुत्र मुख्यमंत्री झाल्याचा मोठा परिणाम संपूर्ण प्रदेशावर उमटू लागला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासाला नवी गती मिळाली. विदर्भाच्या भूमीत जन्मलेला मुख्यमंत्री असणे हे या प्रदेशासाठी एक सुवर्णसंधी ठरली.

विकासाची गंगा
केंद्राचा अर्थसंकल्प असो, अथवा राज्याचा येणारा अर्थसंकल्प असो, विदर्भाला आता भरघोस निधी मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाची गंगा विदर्भात आणण्याचा निर्धार केला आणि तो कृतीतही उतरवला. आता विदर्भात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करण्यात आल्या असून सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. ‘जे बोलतो ते करतो, आणि जे करतो ते झळाळून दिसतं’ या त्यांच्या धोरणामुळे विदर्भाचा कायापालट सुरू आहे.
महाविकासाआघाडीच्या काळात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप मिळालं असा आरोप पूर्वी केला जायचा, पण आता मंत्र्यांचे दौरे विदर्भात वाढले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात बोटावर मोजण्या इतके तास विदर्भात राहणारे नरहरी झिरवळ दोन दिवस विदर्भात मुक्कामी होते. नरहरी झिरवाळ यांनी नुकत्याच झालेल्या दौऱ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामांचा आढावा घेतला. अन्नातील भेसळ थांबवण्यासाठी त्यांनी 28 मोबाईल लॅब सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे अन्न नमुन्यांची तपासणी जलद गतीने होईल आणि नागरिकांना सुरक्षित अन्न मिळेल.
Vijay Wadettiwar : आरोपीला पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर संतापाचा कडाडा
धोरणांवर अंमलबजावणी
दुधात भेसळ हा विदर्भात मोठा प्रश्न राहिला आहे. त्यामुळे दुधाच्या गुणवत्तेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी फडणवीस सरकारने कठोर धोरण राबवले आहे. पशुपालकांकडून दुधाचे नियमित नमुने घेण्याचे आदेश देण्यात आले असून, दुधाच्या संपूर्ण साखळीवर कठोर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठ्यावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना नियमित तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद
मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथील शैक्षणिक परिस्थितीत होत असलेला बदल. बडनेरा येथे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला भेट देऊन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्वरित निर्णय घेण्यात आले.
विदर्भात उच्च शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी केली जात आहे. महाविद्यालये, तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची संख्या वाढवण्यावर सरकारचा भर आहे.
विदर्भाचा सुवर्णयुग
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे विदर्भाला सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे. केवळ घोषणा नव्हे, तर विकासाची ठोस पावलं उचलली जात आहेत. उद्योगधंद्यांसाठी विशेष धोरण तयार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नवे उपक्रम राबवले जात आहेत, आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पूर्वी ‘विदर्भ वंचित’ असा शब्द वापरण्यात यायचा, पण आता तो इतिहास जमा होत आहे. विदर्भाचा विकास हा केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात घडतो आहे. ‘माझं सरकार, माझा विकास’ हा मंत्र घेत, फडणवीस यांनी विदर्भाच्या प्रगतीला नवी दिशा दिली आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जात आहेत.