
26 वर्षांच्या राजकीय प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेसने संघर्ष, सत्तांतर आणि विचारांची मशाल जपली. आज या वाटचालीला नवे वळण देत पक्षाने नेतृत्व, निष्ठा आणि नवदृष्टीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे.
1999 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवास केवळ राजकीयच नव्हे, तर विचारधारांच्या संघर्षातून आकारलेली एक वेगळी ओळख बनलेला आहे. सत्तेच्या वाटचालीत अनेक चढ-उतार अनुभवत, निष्ठावान कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पक्षाला आजच्या निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले आहे. पक्ष वाढवण्यासाठी प्रवाहात अनेक नव्या चेहऱ्यांना सामावून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आणि यशस्वीपणे पक्ष विस्ताराचा मार्ग मोकळा करण्यात आला.
एनडीएचा अकरावा वर्धापनदिन हा केवळ युतीचा उत्सव नव्हता, तर केंद्रातील सत्ता टिकवण्याचा आणि विचारांच्या जवळ येण्याचा एक टप्पा होता. 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे एनडीएत सहभागी होण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. या दरम्यान अनेक राजकीय उलथापालथी घडल्या, काँग्रेससोबतची युती तुटली, निवडणुकीत चार वेगवेगळे पक्ष स्वतंत्रपणे उतरले आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींनी राजकीय रंगमंच हादरला.

विचारसरणी जपली
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट सांगितले की, भाजपसोबत युती करणे ही कोणतीही अनपेक्षित गोष्ट नव्हती. 2014 पासूनच या संदर्भात चर्चा सुरू होती. आम्ही नेहमीच पुरोगामी विचारसरणी जपली असून, एनडीएत सहभागी होतानाही त्या भूमिकेपासून आम्ही दूर गेलो नाही.
पटेल पुढे म्हणाले, पहलगाममध्ये जेव्हा पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्माच्या नावाखाली निर्दोषांची हत्या केली, तेव्हा देशाने त्या हल्ल्याला कशा प्रकारे उत्तर द्यावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला दाखवून दिले. 26/11 मधील हल्ल्याच्या वेळी आम्ही सत्तेत होतो. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पण पाकिस्तानला त्या वेळेस कोणतेही ठोस उत्तर दिले गेले नव्हते.
जनगणनेची मागणी
पटेल म्हणाले, आज भारताने शत्रुराष्ट्रांना त्यांच्या जागेवर बसवण्याचे सामर्थ्य दाखवले आहे. सत्तेचा उपयोग केवळ खुर्चीपुरता मर्यादित न ठेवता, कोट्यवधी महिलांना सक्षम करण्यासाठी केला गेला. हीच खरी लोकशाही आणि सत्तेची जबाबदारी आहे. जातीय आधारे जनगणनेची मागणी आम्ही काँग्रेसच्या काळात केली होती. मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे ती पूर्ण झाली नाही. आता ती जनगणना होणार आहे. पक्ष मोठा झाला तर आपण सर्वजण मोठे होतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असेही पटेल यांनी सांगितले. “पक्षाला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र कोणतीही अफवा, टीका किंवा कारस्थान कार्यकर्त्यांना डगमगवू शकले नाही.
दादांनी राज्याचे नेतृत्व घ्यावे
कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांना सलाम करत स्पष्टपणे सांगितले की, आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ काम करणारा नेता म्हणून अजितदादांचा विक्रम कोणी मोडू शकणार नाही. पण केवळ उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीसाठीही अजित पवार हेच योग्य व्यक्ती आहेत.
तटकरे पुढे म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अडीच कोटी महिलांना लाभ मिळवून देण्यात आला आहे. या यशामध्ये आमदार अदिती तटकरे यांचाही मोलाचा वाटा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती धर्माला बाधा न येता नेत्रदीपक कामगिरी केली जाणार आहे. नव्या पिढीतील नेतृत्व आणि नव्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत तटकरे म्हणाले, “नवीन तरुणांची फळी उत्साही, अभ्यासू आणि जनतेच्या मनोवृत्तीशी जुळणारी आहे. त्यांच्यामुळे पक्षाला नवी दिशा आणि वेग मिळणार आहे.
नवे ध्येय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या विचारधारेवर ठाम राहून अनेक आव्हानांचा सामना केला. सत्ता मिळवण्यासाठी आणि ती लोकहितासाठी वापरण्याच्या भूमिकेतून पक्षाने एक विश्वासार्ह पर्याय म्हणून स्वतःची प्रतिमा घडवली आहे. आज जेव्हा राजकारण व्यक्तिगत स्वार्थ, ईर्षा आणि कुरघोड्यांच्या भोवऱ्यात सापडले आहे, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची विचारप्रधान, पुरोगामी आणि कार्यकर्त्यांशी बांधिलकी असलेली वाटचाल ही प्रेरणादायी ठरते. येत्या निवडणुकीत पक्षाने संघटनबांधणी, नेतृत्वधोरण, नव्या पिढीचा समावेश आणि सत्तेचा जनकल्याणासाठी वापर या चार स्तंभांवर भर देत आपली ताकद वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.