
नागपूरच्या महाल परिसरात उसळलेल्या हिंसाचारात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावाकडून विनयभंगाचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
नागपूर शहरातील महाल भागात 17 मार्च रोजी रात्री दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष उसळला. घटनेदरम्यान पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा काही उपद्रवी जमावाने विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडवला. या प्रकाराची तातडीने चौकशी करावी आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
सदर घटनेत जमावातील काही व्यक्तींनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्दीला हात घालण्याचा, शिवीगाळ करण्याचा आणि अश्लील टिप्पण्या करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवताना, ही घटना केवळ लाजीरवाणीच नाही तर संपूर्ण पोलीस दलाच्या शिस्तीवर आघात करणारी असल्याचे ठामपणे सांगितले. घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींना ओळखून कठोर कारवाई करावी. घटनेदरम्यान इतर महिला नागरिकांवरही कोणताही अन्याय झाला का, याची सखोल तपासणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

अधिक सक्षम बनण्याची गरज
भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी व्यापक उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन, अत्याधुनिक प्रशिक्षण, आवश्यक तांत्रिक साधनसामग्री आणि संरक्षक उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश गोऱ्हे यांनी दिले आहेत. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी असेही म्हटले की, महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कायदा-सुव्यवस्था हाताळताना अधिक सक्षम बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आखले जावेत. त्यासाठी एक ठोस धोरण तयार करून शासनाला प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली.
पोलीस दलाबद्दल समाजात विश्वास आणि आदरभावना निर्माण व्हावी, यासाठी व्यापक जनजागृती मोहिम राबवण्याचेही महत्व त्यांनी स्पष्ट केले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला होणे ही केवळ त्यांच्यावर अन्याय नाही, तर संपूर्ण कायदा व्यवस्थेवर आक्रमण असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने आणि पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर आणि प्रभावी पाऊले उचलावीत, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत.
कठोर कारवाईचे आदेश
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने, महिला पोलीस दलासाठी विशेष प्रशिक्षण, त्यांची मनोबलवृद्धी आणि त्यांना सुरक्षित वातावरण देण्याचे धोरणात्मक प्रयत्न आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही, असा ठाम इशारा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील कोणतीही अवमानकारक वर्तनाची घटना शासन सहन करणार नाही, असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. समाजानेही अशा घटनांचा तीव्र निषेध करावा आणि पोलीस दलाला पाठबळ द्यावे, हेच आपण सगळ्यांचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.