
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात भाजपने जातीय संघटनांपासून दूर राहावं असा स्पष्ट इशारा दिला.
थेट भाष्य करणं आणि वास्तव बोलणं ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासियत. त्यांच्या भाषणांमध्ये केवळ राजकीय मसलती नसतात, तर कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारी खोल विचारधारा असते. नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणाने उपस्थितांना विचारमग्न केले. गडकरी म्हणाले, भाजप हा कोणत्याही एका जातीसाठी नव्हे, तर सर्वांचा पक्ष आहे. पण महापालिकेच्या तोंडावर काही जातीय संघटनांनी उमेदवारीसाठी पत्रं आणली, तर ही दुर्दैवी गोष्ट आहे.
भाजपमध्ये जातीवर आधारित संघटनांचं राजकारण होणं चुकीचं आहे. त्यांनी याबाबत स्वतःची चूक मान्य करत सांगितले की, राजकीय प्रवासाच्या सुरुवातीला मीही असाच एक प्रयत्न केला होता. पण नंतर लक्षात आले की अशा संघटनांना त्यांच्या जातीतील लोकसुद्धा गांभीर्याने घेत नाहीत.या भाषणात गडकरी यांनी अनेक पक्षनेत्यांना अप्रत्यक्षपणे संदेश दिला की पक्ष म्हणजे केवळ तुमचं कुटुंब नाही, तर कार्यकर्तेही त्याच कुटुंबाचे सदस्य आहेत. माझी मुलं आजही राजकारणात नाहीत. मी कधीच त्यांच्यासाठी तिकीट मागितलं नाही, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांविषयी आपली बांधिलकी व्यक्त केली.

Abu Azmi : धर्माच्या आगीतून नेत्यांची राजकीय भाकरी भाजण्याचा ब्रँड पुन्हा सक्रिय
संघटन बळकटीसाठी प्रयत्न
प्रत्येक कार्यकर्ता आपल्या कुटुंबासारखा आहे. त्याच्या भावनांचा, त्याच्या मेहनतीचा सन्मान होणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. या कार्यक्रमात त्यांनी पक्षाच्या संघर्षमय इतिहासालाही उजाळा दिला. 1952 वर्षी जेव्हा आम्ही काम सुरू केलं, तेव्हा संसाधनं नव्हती, साधनं नव्हती. पण कार्यकर्त्यांचं निस्वार्थ समर्पण होतं. 1980 वर्षी भाजपची स्थापना झाली, त्यावेळी नागपुरात शांतीभूषण आणि राम जेठमलानी यांच्या उपस्थितीत एका छोट्याशा मैदानात कार्यक्रम झाला होता. आता तोच पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष ठरतोय, हे त्या कार्यकर्त्यांच्या बलिदानाचं फलित आहे, असं ते भावूक होत म्हणाले.
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात गडकरींच्या विचारांना साथ दिली. हे पक्ष कार्यालय म्हणजे शहराचं नव्हे, तर विदर्भाच्या भाजप संस्कृतीचं प्रतिनिधित्व करते. या कार्यालयात असंख्य लोकांचं योगदान आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात आतापर्यंत दीड कोटी सदस्य नोंदवले गेले असल्याचं सांगत संघटनेच्या बळकटीकरणाची माहिती दिली. या संपूर्ण कार्यक्रमातून गडकरींनी केवळ भाषण केलं नाही, तर पक्षातील अनेकांना एक प्रकारचा आरसा दाखवला. त्यांनी हेही स्पष्ट केले की पक्ष चालवताना वैयक्तिक स्वार्थ आणि जातीय हितसंबंध बाजूला ठेवणं गरजेचं आहे.
Anil Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय?