
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीमध्ये मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आणि संघाची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली.
महाराष्ट्रात ऑक्टोबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील राजकीय रणभूमी पुन्हा एकदा उकळत आहे. या महत्त्वाच्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) मिळून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. नागपूरमधील रेशीमबाग येथील संघाच्या मुख्यालयात आयोजित झालेली समन्वय बैठक या तयारीचा पहिला ठळक पुरावा ठरली.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह संघाच्या विदर्भ प्रांताचे संघचालक दीपक राव तामशेट्टीवार, सहप्रांत संघचालक श्रीधर गाडगे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया आणि 150 हून अधिक वरिष्ठ संघ पदाधिकारी उपस्थित होते. या उपस्थितीमुळे निवडणुकींमध्ये भाजपच्या दृष्टीने या बैठकीचे राजकीय महत्त्व अधिकच अधोरेखित झाले. आगामी ऑक्टोबर महिन्यात नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर यांसारख्या प्रमुख महानगरपालिकांबरोबरच जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत या भागातील राजकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन आगामी सहा महिन्यांसाठी रणनिती आखण्यात आली.

Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या सुखासाठी आमदारांचा थेट मातीशी संवाद
विकासावर विशेष लक्ष
बैठकीत स्थानिक पातळीवरील जनतेच्या भावना जाणून घेणे, त्यांची समस्या आणि अपेक्षा समजून घेणे यावर भर देण्यात आला. नागरी सुविधा, पायाभूत विकास, भ्रष्टाचार विरोधी उपाययोजना, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन हे निवडणुकीचे मुख्य मुद्दे ठरले. याशिवाय बूथ लेव्हल मॅनेजमेंट आणि प्रचार यंत्रणा कशी अधिक प्रभावीपणे राबवावी, यावरही सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या निवडणुकीला भाजपने किती मोठे महत्त्व दिले आहे, हे स्पष्ट झाले. आरएसएसच्या संघटनात्मक मदतीने भाजप अधिक प्रभावीपणे मैदानात उतरायला सज्ज आहे. आगामी निवडणुकींमध्ये दोन्ही संघटनांच्या सहकार्याने सत्ता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कठोर प्रयत्न होणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.
राज्यातील राजकीय परिस्थिती आता निवडणुकीच्या तोंडावर असून, भाजपसह इतर पक्षही आपापल्या युक्त्या आखण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर होणाऱ्या या निवडणुकींचा राज्यातील पुढील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे या बैठकीत तयार केलेली रणनीती भाजपसाठी निर्णायक ठरणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासकामे, लोकांचे विश्वास मिळवणे, तसेच स्थानिक नेतृत्वाची ताकद वाढवणे या मुद्द्यांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी काळात या भागातील राजकारणात लाटांतराची शक्यता दिसून येत आहे. यंदा निवडणुकींचा रंग कसा उधळतो, याकडे सर्वांची नजर लागली आहे.
Prakash Ambedkar : काँग्रेस – भाजपची युती अन् दलालांची मौन यात्रा