अनिल देशमुखांच्या गाडीवर झालेला दगडफेक हल्ला खरा असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टने सिद्ध केले. पण सुरुवातीपासूनच पोलिसांनी राजकीय दबावाखाली चुकीचा अहवाल सादर केला, असे देशमुखांनी आरोप केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील दगडफेक प्रकरणाने नवे वादळ उठवले आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या धामधमीत घडलेल्या या घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग चढवण्याचा प्रयत्न झाला, असा थेट आरोप देशमुख यांनी केला आहे. सत्ताधारी नेत्यांनी आणि पोलिसांनी या प्रकरणाला बनावट ठरवण्यासाठी घाईघाईने पावले उचलली, असा दावा त्यांनी केला. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख यांनी या प्रकरणाचे सत्य फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे उघड केले. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाने सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाला नवी धार आली आहे. देशमुख यांनी सत्ताधारी नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत, त्यांनी या घटनेला ‘सलीम-जावेदची स्टोरी’ असे हिणवल्याचा उल्लेख केला. तसेच, नागपूर ग्रामीण पोलिसांनी राजकीय दबावाखाली फॉरेन्सिक अहवालाची वाट न पाहता घाईघाईने या हल्ल्याला बनावट ठरवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या साऱ्या नाट्यामुळे देशमुख यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ज्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
दगडफेकीचा पुरावा
देशमुख यांनी पत्रकार परिषदेत फॉरेन्सिक अहवालाचे निष्कर्ष सविस्तर मांडले. अहवालानुसार, त्यांच्या गाडीवर दोन व्यक्तींनी दगडफेक केली. एकाने मोठा दगड गाडीच्या पुढील काचेवर मारला, तर दुसऱ्याने मागील बाजूच्या काचेवर दगड फेकला. ज्यामुळे काच फुटली आणि देशमुख यांच्या कपाळाला गंभीर जखम झाली. ही घटना निवडणुकीच्या काळात घडली. जेव्हा त्यांच्या गाडीवर अंधारात लपलेल्या व्यक्तींनी हल्ला केला. या अहवालाने देशमुख यांच्या दाव्याला बळ दिले आहे.
Parinay Fuke : मुख्यमंत्र्यांचा साक्षीने दादांनी दिले सशक्त महायुतीचे संकेत
घटनेनंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी नागपूर ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे हल्ला बनावट असल्याचा दावा केला. फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा न करता झालेल्या या घाईगडबडीमुळे देशमुख यांनी पोलिसांवर राजकीय दबावाचा आरोप केला. त्यांच्या मते, मतदानाच्या तोंडावर या प्रकरणाला बनावट ठरवून मतदारांवर परिणाम करण्याचा डाव होता. आता फॉरेन्सिक अहवालाने सत्य समोर आणले आहे. देशमुख यांनी याप्रकरणी कायदेशीर लढाई लढण्याचा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक युद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
