महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची ‘होमटाऊन’मध्ये एन्ट्री

Nagpur Riots : यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भडकविली दंगल 

Share:

Author

नागपुरातील काही भागांत उसळलेल्या सुनियोजित दंगलीमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूर गाठत परिस्थितीचा आढावा घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

नागपुरातील काही भागांत उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूर गाठत परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाही, नागपुरातील परिस्थितीच्या गांभीर्यामुळे त्यांनी नागपूरला येण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री 21 मार्च शुक्रवारी रात्री उशिरा नागपुरात दाखल झाले आणि पोहोचताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. 22 मार्च शनिवारी सकाळी झालेल्या या बैठकीत त्यांनी दंगलग्रस्त भागातील परिस्थिती, झालेल्या वित्तीय व मालमत्तेच्या नुकसानीचा आणि जखमी पोलीस व नागरिकांची माहिती घेतली. यानंतर त्यांनी शहरातील महाल, गांधी गेट, मोमीनपुरा, हंसापुरी, भालदारपुरा आणि लकडगंज, गणेशपेठ, तहसील यासारख्या तणावग्रस्त भागांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागांमध्ये सकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष नजर ठेवण्यात येत आहे.

High Court : नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा मोठा कसोटी क्षण

सोशल मीडियावरून पेटवला वाद

फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना नागपुरातील ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. काही समाजकंटकांनी आधीच दगड आणि पेट्रोलबॉम्बचा साठा करून ठेवला होता व ठरवून पोलिसांवर तसेच नागरिकांवर हल्ला केला. या दंगलीत जवळपास शंभरहून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अनेक दुकाने व घरे पेटवून दिल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यानेच या दंगलीचा कट रचल्याची माहिती मिळाली आहे. त्याने पक्षाचा शहराध्यक्ष फहीम खान आणि यूट्यूबवरील पत्रकार मोहम्मद शहजाद खान यांच्यासह कट आखल्याचे पोलिसांना समजले. विशेष म्हणजे, शहजाद खानने 17 मार्च रोजी सकाळपासूनच आपल्या यूट्यूब चॅनेलवर भडकावू पोस्ट्स आणि भाषणांचे प्रसारण केले होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत हिंसाचाराची शक्यता पोलिसांनी ओळखली होती.

Vidarbha : मनपाचे आर्थिक शिस्तीचे बजेट

कठोर कारवाई

देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात यथोचित कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दंगलमुळे प्रभावित नागरिकांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानभरपाईबाबत निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सूचित केले.

सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधातही सायबर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर शहरात सध्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांबरोबरच स्थानिक नेत्यांनाही शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

अनेकांची प्रतिक्रिया

दंगलीनंतर शहरात राजकीय व सामाजिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्वच पक्षांतील नेत्यांनी एकमुखाने शांततेचे आवाहन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नागपूरकर नागरिकांमध्ये देखील या घटनेमुळे संताप व अस्वस्थता आहे. राज्य सरकारकडून लवकरच एक उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत होण्याची शक्यता आहे. या दंगलीमागील सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) तयार करण्याचा विचार सुरु आहे.

नागपुरातील दंगल ही केवळ एक अपघाती घटना नसून, एक सुनियोजित कट असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने घेतलेला दौरा आणि पोलीस यंत्रणेचे कठोर पावले यामुळे येत्या काही दिवसांत दोषींवर ठोस कारवाई होण्याची शक्यता आहे. तर दोषींना मुख्यमंत्री कशा प्रकारे धडा शिकवतात, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!