महाराष्ट्र

Prakash Ambedkar : शिंदे–पवार सावध व्हा, अजगर गिळून टाकेल

Mahayuti : शंभर दिवसांची प्रगती की धोक्याची घंटा?

Author

नुकताच महायुती सरकारने शंभर दिवसांचा निकाल जाहीर केला असतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे.

राजकारणात वक्तव्यांमधून किती आग धगधगते, हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या प्रगती पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कामगिरी सादर केली. पण ही कामगिरी पाहून आंबेडकर थेट आक्रमक झाले. त्यांनी सत्तेत असलेल्या नेत्यांना सावध राहण्याचा इशारा दिला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात की सरकारने बऱ्याच सुधारणा केल्या. पण खरेच काय बदल घडले?

कोणाचा परफॉर्मन्स चांगला झालाय हे ते स्पष्ट का सांगत नाहीत? त्यांच्या मते, महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी काही प्रमाणात क्रेडिट एकनाथ शिंदेंना द्यायला हवे. शिंदे यांनी महिलांना 1 हजार 500 रुपये दिले. त्यामुळे कंज्यूम पॉवर वाढली. पण याचा परिणाम फारसा दीर्घकालीन असेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट इशाराच दिला. हे दोघं सावध राहिले पाहिजे. नाहीतर अजगर कधी गिळणार हे त्यांना कळणारही नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर आरोप केला की ते संधीची वाट पाहत आहेत.

राजकीय समीकरणांमध्ये हालचाल

राजकारणात हे अजगर कोण हे स्पष्ट न सांगता त्यांनी संकेत दिले की महायुतीत अंतर्गत स्पर्धा आणि सत्तेसाठी धडपड सुरू आहे. कामगार हक्कांवरही आंबेडकर यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. कामगार चळवळी आता लुप्त झाल्यासारख्या वाटतात. कोणीही आता त्यांच्या हक्कासाठी उभे राहत नाही. हा धोका आहे. कामगारांच्या हक्कांची जपणूक झाली पाहिजे, अन्यथा यंत्रणाच कोलमडेल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. राजकीय वर्तुळात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा गाजत आहे.

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी मोदींचा सत्कार करावा

आंबेडकर म्हणाले, हो, मला वाटतं उद्धव आणि राज एकत्र येतील. ही अस्तित्वाची लढाई आहे. एकमेकांशी वैचारिक मतभेद असले तरी शिवसेनेच्या मूळ विचारासाठी ते एकत्र येतील. पवार कुटुंबाच्या एकत्र येण्याच्या चर्चेलाही त्यांनी छेद दिला. पवार कधीच वेगळे नव्हते, हे मी आधीच सांगितलं होतं, असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील नातेसंबंध कायम असल्याचे सूचित केले. प्रकाश आंबेडकरांच्या या टीकांमुळे राज्यातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. त्यांच्या वक्तव्यांमध्ये स्पष्टपणे दिसते की, महायुतीच्या आंतरिक धुसफुशीवर त्यांची नजर आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस यांच्यातील सत्तासंघर्ष लपवण्याचा प्रयत्न होत असला, तरी आंबेडकर यांनी तो उघड पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!