महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना, राज ठाकरे हे महायुतीसोबत युती करणार अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक पक्ष आपली कंबर कसून महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे. अशातच, राजकीय युती आणि दगाफटक्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 5 जुलै 2025 रोजी ठाकरे बंधूंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल दोन दशकांनंतर हातमिळवणी केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवा ट्विस्ट दिला. या युतीमुळे सर्वांचे डोळे मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले होते. पण, या युतीला बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पहिल्याच फटक्याने धक्का बसला.
ठाकरे बंधूंना पराभवाचा कडवट घोट गिळावा लागला. त्यातूनच राजकीय गोटात नव्या चर्चांना उधाण आले. पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. वर्षा बंगल्यावर पाऊण तास चाललेल्या या गुप्तगू भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरे हे महायुतीच्या गोटात सामील होणार का, अशी कुजबुज सुरू झाली. पण, फडणवीसांनी आपल्या खास शैलीत सगळ्या अफवांना फुली मारली. एखादा नेता मला भेटला म्हणून युती होत नाही, राजकारणही तसं ठरत नाही, असे सांगत त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या शक्यतेचे सर्व दरवाजे बंद केले.
Nana Patole : वाहतूक पोलिसांच्या टार्गेटने जनतेच्या खिशाला कात्री
मित्रपक्षांची अभेद्य एकजूट
महायुती एकसंघ राहणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्र लढणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ही खेळी म्हणजे राज ठाकरेंना स्पष्ट संदेश होता आमच्या गाडीला आता नव्या प्रवाशाची गरज नाही. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभवाचा धक्का बसल्यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. पण राज ठाकरेंबाबत मौन बाळगले. यामागे राजकीय रणनीती असल्याची चर्चा होती. पण, फडणवीसांनी या सगळ्या अटकळांना पूर्णविराम देत राज ठाकरेंच्या महायुतीत येण्याच्या आशा धुळीला मिळवल्या. लोकांनी भ्रमात राहण्याचे कारण नाही. महायुती अभेद्य आहे. आम्ही एकत्रच निवडणूक जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. यावर फडणवीसांनी गालिबचा शेर काढत टोमणा मारला ‘दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है…’ आणि विरोधकांना सणसणीत चपराक लगावली. जोपर्यंत विरोधक जनतेचा अपमान करत राहतील आणि आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा विजय अशक्य आहे, असे फडणवीसांनी ठणकावले. महापालिका निवडणुकीच्या या रणधुमाळीत ठाकरे बंधू आणि महायुती यांच्यातील हा राजकीय डावपेचांचा खेळ आणखी रंगतदार होणार आहे. फडणवीसांच्या या खेळीमुळे राज ठाकरेंच्या मनसेची पुढची चाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ajit Pawar : विधान परिषदेच्या पदावरून अमोल मिटकरींचा गेम ओव्हर?
