
पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा करून केवळ तीन तासांतच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या कुरापतींवर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा होताच अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जगासमोर आपली नकारात्मक वृत्ती उघड केली आहे. भारताच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करत आणि गोळीबार सुरू करून पाकिस्तानने युद्धबंदीच्या निर्णयाची थट्टा केली. या संपूर्ण प्रकाराला भारतीय लष्कराने तत्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर देत सीमांचं रक्षण केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या पार्श्वभूमीवर कडव्या शब्दांत पाकिस्तानला सुनावलं. पाकिस्तान कधीही सुधारणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र करून पाकिस्तानचे आणखी दोन तुकडे करण्याची वेळ आल्याचं नमूद केलं आहे.

कणखर भूमिकेची गरज
रोहित पवार यांनी आपली भूमिका अत्यंत ठामपणे मांडली. युद्धबंदी झाली तरी पाकिस्तानसारख्या कुरापतखोर देशाकडून शांतीची अपेक्षा बाळगणं म्हणजे स्वतःला फसवणं आहे, असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी 1971 साली स्वर्गीय इंदिरा गांधींनी घेतलेल्या निर्भीड भूमिकेचा उल्लेख करत, त्याच धर्तीवर आज भारताने निर्णायक पाऊल उचलण्याची गरज आहे, असं सांगितलं.
Congress : स्फोटांच्या धुराळ्यात नागपूर व्हावी भारताची बॅकअप कॅपिटल
बलुचिस्तानला स्वतंत्रता देऊन सध्याच्या पाकिस्तानचे आणखी तुकडे करणे हाच पाकिस्तानला अद्दल घडवण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. भारताची सेना सज्ज आहे. देशवासीयांचा विश्वास सेना आणि सरकारवर आहे. सर्व राजकीय पक्ष एकत्र आहेत, हेही त्यांनी स्पष्ट केलं.
अकरा ठिकाणी उल्लंघन
भारत-पाकिस्तान सीमांवर पुन्हा एकदा तणावाचे ढग जमले आहेत. पाकिस्तानने जम्मू काश्मीरसह राजस्थानमधील जैसलमेर, बाडमेर, कच्छ आदी भागांमध्ये गोळीबार केला आहे. अनेक ठिकाणी ड्रोनच्या हालचाली आढळून आल्या आहेत. श्रीनगरमध्ये स्फोटांचा आवाज ऐकू आल्याचेही समजते. या घटनांमुळे सीमावर्ती अनेक गावांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आला आहे.
पाकिस्तानने 11 ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आतापर्यंत 9 शहरांमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हालचाली आढळल्या आहेत. या प्रकारांवर भारतीय लष्कर सतर्कतेने आणि क्षणाचाही विलंब न लावता प्रतिसाद देत आहे.
शांततेच्या दिशेने पाऊल
भारताने नेहमीच शांतता आणि संयमाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, पाकिस्तानची धोरणं सातत्याने उर्मट आणि उन्मादी राहिली आहेत. युद्धबंदीच्या निर्णयानंतरही उघडपणे कुरापती करणं ही पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय पताला धोका देणारी कृती आहे. अशा पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेसाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याचं रोहित पवार यांच्या वक्तव्याने स्पष्ट केलं आहे.
रोहित पवारांचा हा जळजळीत इशारा केवळ राजकीय भूमिकेपुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण देशातील जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणारा ठरतो. देशहितासाठी निर्णायक पावलं उचलण्याची मागणी आता अधिक प्रखर होत चालली आहे.