
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले.
महाराष्ट्रात महायुती सरकारला सत्तेत येऊन चार महिने झाले तरी निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने हवेत विरल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. विशेषतः शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या वचनाची पूर्तता झाली नसल्यामुळे संतप्त विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद अधिक चिघळला आहे. कर्जमाफी मिळाल्यानंतर तुम्ही ते पैसे शेतीत गुंतवता का? त्यांच्या या विधानानंतर यवतमाळ येथे उद्धव ठाकरे गटाच्या सैनिकांनी तीव्र निषेध केला आहे.
कोकाटेंच्या सवालाने शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यवतमाळमध्ये ठाकरे गटाने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत कृषिमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवून जोरदार आंदोलन छेडले. शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे.

Chandrashekhar Bawankule : बळीराजाच्या हक्कांसाठी निर्धाराने उभे सरकार
तीव्र आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे. कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागात तूर, द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अशा गंभीर परिस्थितीतही सरकारच्या मंत्र्यांची शेतकऱ्यांविषयीची असंवेदनशील वक्तव्ये विरोधकांना आक्रमक बनवत आहेत.
शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाला योग्य ती मदत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. नियमांप्रमाणे कोणताही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. त्यांनी हेही स्पष्ट केले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम आहे. नुकसानीचे सर्वेक्षण जलदगतीने सुरू आहे.
बळीराज्याला हक्काची मदत
महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. यासाठी कृषी विभाग आणि प्रशासन समन्वय साधत आहेत. बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले की, शेतकऱ्यांचा आत्मसन्मान राखणे आणि त्यांना हक्काची मदत मिळवून देणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यास कटिबद्ध आहे. मात्र, विरोधकांचा आरोप आहे की, सरकारने केवळ घोषणा आणि आश्वासनांपलीकडे काहीही केले नाही.