
महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होताना दिसत आहे. फडणवीसांनी ‘फिक्सर’ अधिकाऱ्यांविरोधात उचललेल्या पावलांचे उद्धव ठाकरे यांनी खुलेआम कौतुक केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
भोलेनाथाच्या जयघोषानंतर महाशिवरात्री संपली आणि भक्तीचा रंग विरला, आता होळीचे रंग उधळण्याची वेळ आली आहे. ‘होळीचा रंग सुकतो, पण राजकारणातील रंग टिकतो’ हे खरं होतांना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर रंगांचा नवा खेळ सुरू झाला आहे. एकेकाळी कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आता जवळ आले असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर टीकेची रंगपंचमी उधळणारे हे दोन नेते आता मैत्रीचा गुलाल उधळताना दिसत आहेत. राजकीय संबंधांमध्येही होळीच्या सणासारखीच गंमत आहे. कालपर्यंत कटुता असते, पण पुढच्या क्षणी सगळे मतभेद विसरून एकमेकांवर रंग टाकण्याची तयारी होते.

Buldhana : शिवसेना नेत्याला स्वतःवर विश्वास, मर्सिडीजवर नाही
शिंदेंवर टीकेचा शिमगा
ठाकरे गटाच्या मुखपत्रातून फडणवीस यांच्यावर स्तुतीचा गुलाल उधळला जात असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मात्र टीकेचा काळा रंग फासला जात आहे. फडणवीसांनी राज्यातील ‘फिक्सर’ अधिकाऱ्यांविरोधात उचललेल्या पावलांबद्दल शिवसेना (ठाकरे गट) विशेष कौतुक करत आहे. संजय राऊत यांनीही फडणवीसांचे समर्थन करत त्यांना स्वच्छता मोहीम राबवणारा ‘रंगपंचमीचा सच्चा खेळाडू’ म्हटले आहे.
ठाकरेंच्या मुखपत्रात असे म्हटले आहे की, ‘राज्यात दलालांचे पीक उगवले आहे. हे पीक कापण्याचे काम फडणवीस करत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, हे काम सोपे नाही, कारण या पिकावर एक ‘दाढीवाला खोडकिडा’ बसलेला आहे. तो हटवायचा असेल, तर खऱ्या रंगाची उधळण होणे गरजेचे आहे.
Nashik Kumbh Mela: शिंदे-फडणवीस संघर्ष शिगेला, पवार मात्र ‘मौनीबाबा’
भूतकाळाची आठवण
भूतकाळात शिरले तर निवडणुकीत ठाकरे आणि फडणवीस यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची उधळण केली होती. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. होळीच्या सणात जसा द्वेष, कटुता विसरून रंग खेळले जातात, तसेच आता राजकीय समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नव्या रंगांचा शिडकावा होतो आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक विविध भेटींमधून स्पष्ट होत आहे. 17 डिसेंबरला मुख्यमंत्रिपदी नियुक्तीनंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर, 20 डिसेंबर रोजी अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. तीन जानेवारीला शिवसेना (ठाकरे गट) च्या मुखपत्रातून फडणवीसांच्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले. नऊ जानेवारीला आदित्य ठाकरे यांनी वैयक्तिक कारणासाठी फडणवीस यांची भेट घेतली, ज्यामुळे चर्चेला उधाण आले. अखेर, 20 फेब्रुवारी रोजी सिडको भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समिती स्थापन केल्याबद्दल संजय राऊत यांनीही फडणवीसांचे समर्थन केले. या सततच्या संवादामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत.
Devendra Fadnavis: फिक्सरला ‘एग्झिट’… आता मंत्रालयात खेळ कोण मांडणार
पुढील समीकरणे काय
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक केवळ कौतुकापुरती आहे की ती भविष्यात काही मोठे राजकीय समीकरण घडवेल, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. महायुती सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गटातील तणाव वाढताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत ठाकरे गट आणि फडणवीस यांच्या संवादात आलेली गोडी शिंदे गटासाठी नवा पेच निर्माण करू शकते.
राजकारणात कोणताही रंग कायमस्वरूपी राहत नाही, तो परिस्थितीनुसार बदलतो. फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील संवाद हा केवळ राजकीय व्यूहरचना आहे का, की शिंदे गटाला इशारा देण्याचा भाजपचा एक डाव आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर ठाकरे-फडणवीस एकत्र दिसत असले, तरी हा रंग किती काळ टिकतो आणि शिंदे गटावर त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणे रंजक ठरेल.