महाराष्ट्र

Mumbai : अंदाज समितीचा शाही अंदाज

Public Fund Misuse : चांदीच्या ताटात पंचपक्वान्नांचा थाटमाट

Author

विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकीत चांदीच्या ताटात पंचपक्वान्नांची मेजवानी देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या शाही थाटामुळे सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचे आरोप होत असून, जनतेत तीव्र नाराजी आहे.

काटकसरीचा सल्ला देणाऱ्या विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकीत चक्क चांदीच्या ताटात जेवण, पंचपक्वान्नांचे शाही मेन्यू आणि आलिशान स्वागताची उधळपट्टी केल्याचे वास्तव समोर आले आहे. सरकारी निधीचा वापर संयमाने आणि जनहितासाठी करावा अशी अपेक्षा असताना, शेकडो अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या जेवणावर लाखोंचा खर्च करून राज्य शासनाने साधेपणाच्या प्रत्येक संकल्पनेचा अपमान केल्याची भावना जनतेत उमटू लागली आहे.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये विधिमंडळाचे अध्यक्ष, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. पण कार्यक्रमाच्या स्वरूपावरून ही परिषद काटकसरीचा आदर्श दाखविण्याऐवजी, शाही थाटाच्या प्रदर्शनातच अडकून पडली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis : इंदिरा गांधींनी लोकशाहीला गाडले

उधळपट्टीचा थयथयाट

परिषदेसाठी विधिमंडळ बाहेर 40 फूट उंच फलक उभारण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी वातानुकूलीत शामियाने उभे करण्यात आले. लाल गालिच्याची मिरवणूकही लावण्यात आली. पाहुण्यांच्या निवासासाठी हॉटेल जात पॅलेस आणि ट्रायडंटची निवड करण्यात आली. शाही जेवणासाठी चांदीची ताटे, वाट्या, चमचे आणि ग्लास वापरण्यात आले. या प्रत्येक ताटासाठी 550 रुपये भाडे दिले गेले. एका थाळीचा दर तब्बल 4 हजार रुपये होता. थाळीतील मेन्यू देखील पंचपक्वान्नांनी सजलेला होता. कोथिंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, पुरणपोळी अशा अनेक प्रकारांची रेलचेल होती.

सांस्कृतिक कार्यक्रम, खास कारची व्यवस्था, आणि शेवटी मुंबई दर्शन यासारख्या अनावश्यक खर्चांमुळे सरकारी निधीचा वापर अतिशय भव्यदिव्य पद्धतीने करण्यात आला. ही सर्व व्यवस्था निखील केटरर्स या खासगी कॅटरिंग सेवेला देण्यात आली होती. ज्यांनीच चांदीची भांडी भाड्याने पुरवली होती.

Harshwardhan Sapkal : मतपेटीतून चोरीचा महायज्ञ अन् संविधानाची आहुती

विरोधकांकडून सडकून टीका

घडलेल्या प्रकारामुळे सरकारवर लोकांच्या पैशाची उधळपट्टी केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. राज्यात शेतकऱ्यांची आत्महत्या, बेरोजगारी, आणि योजनांची खोळंबा सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी केलेल्या शाही जेवणाच्या खर्चाने जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील शेतकरी उपाशी आहेत, योजना ठप्प आहेत आणि सरकार चांदीच्या ताटात पाच हजारांची थाळी खाण्यात व्यग्र आहे. ही मानसिकता जनतेपासून दुरावलेली असून, सत्ताधाऱ्यांचा जनतेच्या दुःखाशी काहीही संबंध राहिलेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. अंदाज समितीचा उद्देश सरकारला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देणे असताना, त्या समितीच्याच कार्यक्रमात असा शाही थाट दिसतो, ही विसंगती स्पष्ट आहे. काही महिन्यांपूर्वी धुळ्यातही 5 कोटींचा भपका पाहायला मिळाला होता आणि आता मुंबईत चांदीच्या ताटांचे लखलखाट. रोहित पवार म्हणाले की, एकीकडे जनहिताच्या योजनांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येते, तर दुसरीकडे सरकारी कार्यक्रमांतून शाही ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जाते. हा सरकारचा नियोजनाचा दृष्टीकोन स्पष्ट करणारा भाग असून, यातून गरिबांबद्दल असलेली असंवेदनशीलता स्पष्ट होते.

घडलेल्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे, जनतेचा पैसा हा सार्वजनिक कल्याणासाठी वापरला गेला पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांकडून या पैशाचा वापर केवळ आत्मप्रदर्शनासाठी केला जातोय, ही चिंतेची बाब आहे. अशा खर्चांमध्ये पारदर्शकतेची आणि उत्तरदायित्वाची गरज असल्याची मागणी आता जनतेतून वाढू लागली आहे. विधिमंडळात चर्चा होणाऱ्या आर्थिक नियोजनाचे खरे स्वरूप जर चांदीच्या ताटांमध्ये लपलेले असेल, तर सामान्य जनतेच्या स्वप्नातही साधेपणा, समर्पण आणि जबाबदारी या मूल्यांना जागा मिळणार नाही. त्यामुळेच जनतेच्या पैशाचा वापर जनतेसाठीच व्हावा, हीच सशक्त लोकशाहीची खरी व्याख्या आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!