
महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मराठी अस्मितेचा वाद पुन्हा उफाळला आहे. राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर संघर्ष तेज केला आहे.
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सध्या एका प्रश्नाने अक्षरशः धगधगतं वातावरण निर्माण झालाय. शाळांमध्ये शिकवायची भाषा कोणती? हा प्रश्न आता वर्गखोल्यांपुरता सीमित राहिलेला नाही, तर थेट विधानभवनाच्या दारात येऊन उभा ठाकलाय. एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा, दुसरीकडे केंद्र-राज्य सरकारचा निर्णय यामुळे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा सवाल पुन्हा एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय. महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर झाला आणि इथूनच खऱ्या अर्थाने संतापाचा स्फोट झाला.
मराठीवर घाला का? हा सवाल आता प्रत्येक मराठी मनात गडद होत चाललाय. पहिलीपासूनच हिंदी शिकण्याची सक्ती केल्याने समाजातील विविध स्तरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत ‘हिंदी सक्ती’ विरोधात मोर्चा काढणार आहेत. हा निर्णय मराठी भाषाप्रेमींसाठी जणू उर्जेचा स्रोत ठरतोय. पण या मोर्च्याच्या पायावर राजकारणाचा काटा टोचतोय. यावर भाजप आमदार रवि राणा यांनी जोरदार टीका करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. राणा म्हणतात, महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठीसाठी उभा आहे. पण उद्धव ठाकरेंनी हे नाटक थांबवावं.

राजकीय खेळी उघडकीस
राणा यांच्या मते, हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम रचलेला आहे. मराठी माणसाच्या प्रेमाचा अचानक स्फोट तो देखील निवडणुकीच्या तोंडावर? हा केवळ मतदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न आहे, असं रवी राणा ठामपणे म्हणाले. इतकंच नाही तर काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपदासाठी चाललेल्या वाटाघाटीवरूनही त्यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले.दुसरीकडे भाजपमधून यावर वेगळाच सूर उमटतोय. राज्यात हिंदी सक्ती नाहीच उलट इथे मराठी सक्ती आहे, असा दावा भाजप नेते करत आहेत.
विशेष म्हणजे भाजपचे मंत्री अशोक उईके यांनी भाषिक वादावर वेगळाच दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले, मी आदिवासी समाजातून आलोय… त्यामुळे मला हिंदी येत नाही. पण मग प्रश्न उभा राहतो भाजपच्या मंत्र्यांना खरंच हिंदी येत नाही का? की मराठी मतदारांच्या रोषापासून वाचण्यासाठी घेतलेला राजकीय धोका? राज्याच्या राजकारणात सध्या हाच चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.या संपूर्ण गदारोळामागे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हे गुपित लपलंय का? राजकीय समीकरणे, सत्ता मिळवण्याच्या खेळी आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर होणारी ध्रुवीकरणाची प्रक्रिया हे सर्व घटक आता उघडपणे दिसू लागले आहेत.
Maharashtra : विदर्भासाठी ‘शिस्तबद्ध’ अन् पश्चिम महाराष्ट्रासाठी ‘मुक्तछंद’
मराठीपणाचं अस्तित्व आणि अस्मिता टिकवण्यासाठीचा हा लढा आहे का? की हा केवळ राजकीय फायद्यासाठीचा मुद्दा? हे प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात घोंगावत आहेत.एकूणच, पुढील काही दिवस राज्यात राजकारणाच्या रंगमंचावर भाषेच्या नावाने नवा नाट्यप्रयोग रंगणार हे नक्की.