वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई न मिळाल्यास सत्ताधारी आमदारांच्या घरी ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा ठाम इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीमुळे गळीतलेले नुकसान अजूनही भरून नाही निघाले. यामुळे राज्यातील राजकीय रंगमंच पुन्हा एकदा तापला आहे. दिवाळी जवळ येत असतानाही सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर केलेले धोरणात्मक पॅकेज शेतकऱ्यांच्या हाती पोहचलेले नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. प्रख्यात नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने सरकारला इशारा दिला की, जर दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. तर सत्ताधारी आमदारांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांसह ‘काळी दिवाळी’ साजरी केली जाईल.
राज्यातील अनेक भागांत, विशेषतः मराठवाडा व आसपासच्या जिल्ह्यांत शेतजमिनी पूर्णतः खरडून गेल्या आहेत. या परिस्थितीत रब्बी हंगाम उगवणेही कठीण झाले आहे. सरकारने 32 हजार कोटींच्या मदतीचा पॅकेज जाहीर केला आहे. असे असले तरी, अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही. या दुर्लक्षाविरुद्ध प्रकाश आंबेडकर यांनी ठाम शब्दांत म्हटले की, शेतकऱ्यांचा बळी घेणे सहन करणार नाही. प्रत्येक पूरग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजारांची मदत तत्काळ मिळावी, ही मागणी वारंवार केली जात आहे.
शेतकऱ्यांसाठी राज्यभर मोर्चा
वंचित बहुजन आघाडीने प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर येथे भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चामध्ये साखर कारखान्यापूर्वी उसाचा दर निश्चित करणे. कापसाला हमीभाव मिळवणे. पोट खराब शेतजमिनी सुधारून नोंदी लावणे भूमि अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवणे यांसारख्या विविध मागण्या ठळक पद्धतीने मांडल्या गेल्या. प्रा. किसन चव्हाण यांनी या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला स्पष्ट इशारा दिला की, तहसीलदारांनी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. तर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभरातील सर्व आमदारांच्या घरी मोर्चा काढण्यास बाध्य होईल.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षावर त्वरित कारवाई होईपर्यंत हा संघर्ष सुरु राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसोबतचा हा संघर्ष त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आहे. दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई न मिळाल्यास, सत्ताधारी आमदारांच्या घरी ‘काळी दिवाळी’ साजरी करून शेतकऱ्यांचे दु:ख सत्तेपुढे ठेवले जाईल. कर्जमाफी, हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान हे प्रश्न त्वरित सोडवण्यावर शासनाचे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या ठाम भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्राच्या राजकीय रणनितीत पुन्हा एकदा ठसा उमटवत आहे.
