महाराष्ट्र

Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठोठावला विधिमंडळाचा दरवाजा

Monsoon Session : संत्रा बागा उजळवण्यासाठी दोन बारांची भरपाई गरजेची

Post View : 31

Author

काटोल-सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी विधानसभेत विदर्भातील संत्रा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दोन्ही हंगामांची भरपाई देण्याची मागणी केली.

राज्यात सध्या पावसाळी अधिवेशनाचे वारे जोरात वाहत आहेत. हे अधिवेशन केवळ धोरणे, विधेयके आणि चर्चांसाठी नव्हे, तर जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनले आहे. अशाच एका जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर आवाज उठवणारे आमदार म्हणजे काटोल-सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख. शेतकऱ्यांच्या दु:खाला शब्द देत आणि शासनाच्या एकांगी धोरणांचा पर्दाफाश करत, देशमुख यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे दु:ख विधानसभेत स्पष्टपणे मांडले.

देशमुख यांचा रोख होता, शासन केवळ एका हंगामाच्या नुकसानीपुरती भरपाई का देतात? विदर्भात संत्रा फक्त एक पीक नाही, तर तो बळीराजाच्या आयुष्याचा श्वास आहे, असं ते ठामपणे म्हणाले.देशमुख यांनी आपल्या भाषणात एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. संत्र्याला वर्षातून दोन वेळा फळे येतात. जेव्हा एका हंगामाचे पीक झाडावर लटकलेले असते, तेव्हाच दुसऱ्या हंगामासाठी फुलंही झाडावर उमटलेली असतात. त्यामुळे जर एखादी नैसर्गिक आपत्ती जसे की गारपीट, अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस आली, तर त्याचा फटका फक्त सध्याच्या बाराला नाही, तर पुढील बारालाही बसतो. पण शासनाच्या धोरणात याचा विचार केला जात नाही.

Vidarbha : पूरग्रस्त लोकांसाठी प्रशासनाचा ‘रन फॉर रिलीफ’

धोरणात्मक बदल आवश्यक

सध्या लागू असलेल्या नियमांनुसार केवळ एकाच हंगामाच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाते. देशमुख म्हणाले, हा दृष्टिकोन शेतकऱ्यांच्या वास्तवाशी विसंगत आहे. ही भरपाई फक्त वरवरच्या जखमांवर मलम लावण्यासारखी आहे. सभागृहात आशिष देशमुख यांनी थेट कृषी विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांना विचारले शासन या विषयात धोरणात्मक निर्णय घेऊन संपूर्ण वर्षातील दोन्ही बारांची भरपाई देणार का? यावर मंत्री पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत, ही मागणी योग्य असून, यावर सखोल विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

विदर्भातील हजारो शेतकरी आज संत्रा व मोसंबी बागांवर आपले  उदरनिर्वाह अवलंबून ठेवून जगत आहेत. त्यांच्या जिवनात आलेल्या नैसर्गिक संकटांपुढे ही बागा उध्वस्त झाल्या, तर केवळ उत्पादन नव्हे तर कर्ज फेडण्याचे स्वप्नही चुरगळून जातात. देशमुख म्हणाले, या शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय मिळावा, हीच माझी भूमिका असून, मी सातत्याने यासाठी लढा देत राहणार आहे. विधानसभेत निव्वळ भाषणे करून नाही, तर धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवावेत, असा इशारा देशमुख यांनी सरकारला दिला. त्यांच्या मते, ही फक्त आर्थिक मदत नाही, तर विदर्भाच्या बागायतदारांचा आत्मविश्वास पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न आहे.

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी या द लोकहित लाइव्ह येथे रिपोर्टर आणि टेक्निकल विभागाच्या सहाय्यक प्रमुख देखील आहेत. कॉम्प्युटर विषयात त्यांनी वेबसाइट डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप डेव्हलपमेंट आणि कोडिंग याचेही उच्च शिक्षण प्राप्त केले आहे.

More Posts - Website

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!