
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वारीच्या पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे वादग्रस्त विधान केले. या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेवरच आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. वारीच्या पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होते, असे विधान करून आझमी यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या. त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप आणि आझमी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत आझमींवर निशाणा साधला. वडेट्टीवार म्हणाले की, अबू आझमी हे भाजपच्या इशाऱ्यावरच वादग्रस्त विधाने करतात. त्यांची वक्तव्ये आणि त्यावर भाजपकडून होणारी प्रतिक्रिया ही एक प्रकारची राजकीय युती असल्याचे त्यांनी सूचित केले.

विवाद निर्माणाची खेळी
वडेट्टीवार यांनी आरोप केला की, अबू आझमी यांचे प्रत्येक विधान ठरवून केले जाते. ते मुस्लिम समाजाविरोधात अन्याय होत असल्याचे दाखवतात. त्याच वेळी भाजप हे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे भांडवल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भाजप आणि आझमी यांच्यात अप्रत्यक्ष समन्वय असल्याचे सिद्ध होते. ते पुढे म्हणाले की, अबू आझमी नेहमीच एखाद्या धार्मिक किंवा सांस्कृतिक विषयावर वादग्रस्त विधान करतात. त्यातूनच समाजात हिंदू-मुस्लिम मतभेद निर्माण होतात. ही पद्धत पूर्वनियोजित आहे. त्यामागे राजकीय स्वार्थ दडलेला आहे. भाजपला हाच मुद्दा हवा असतो आणि आझमी त्यासाठी मुद्दामहून वाद निर्माण करतात.
अबू आझमी यांनी सोलापुरात केलेल्या वक्तव्यात म्हटले होते की, वारकऱ्यांच्या पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होते, तर नमाज रस्त्यावर केल्यास तक्रारी दाखल केल्या जातात. त्यांनी याचा संदर्भ देत असा आरोप केला की, काही लोक मुद्दामहून मुस्लिमांविषयी तक्रारी करतात. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे वारीच्या परंपरेचा अवमान झाल्याची भावना जनतेमध्ये व्यक्त होत आहे. वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तिला विरोध करणारे कोणतेही विधान राज्यात सहन केले जात नाही. त्यामुळे आझमी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Pyare Khan : महाराष्ट्र पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी तयार?
नव्या वादाची ठिणगी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांना लक्ष्य करत स्पष्टपणे म्हटले की, अबू आझमी हे प्रसिद्धीच्या लायक नाहीत. त्यांनी हेही सांगितले की, आझमींना वादग्रस्त विधानं करून प्रसिद्धी मिळवायची सवय आहे. त्यामुळे आपण त्यांच्या विधानाला महत्त्व देत नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी हेही नमूद केले की, वारकरी संप्रदायाच्या परंपरेवर टीका करणे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात संत परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिचा अवमान करणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही.
अबू आझमी यांचा वादग्रस्त विधान करण्याचा इतिहास जुना आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोगल बादशहा औरंगजेबाचे समर्थन करून तो एक चांगला शासक असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर राज्यभरातून टीका झाली होती. आता वारीसंदर्भात त्यांनी केलेल्या विधानामुळे दुसऱ्यांदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सर्व प्रकारामुळे अबू आझमी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ते वारंवार अशा वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्यावर भाजपच्या इशाऱ्यावर बोलत असल्याचेही ठसठशीत आरोप होत आहेत.