
नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद अद्यापही सुरूच आहे. यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीला सल्ला देत टोला लगावला आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकदा मतभेद उफाळून आले आहेत. भाजपने नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, त्यामुळे महायुतीत अंतर्गत वादाला अधिकच धार आली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत बोचऱ्या टीका सुरू केल्या आहेत. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीला नाशिकच्या पालकमंत्री नियुक्तीसाठी सल्ला दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असताना भाजपने गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, महाजन यांची नियुक्ती राष्ट्रवादीला मान्य नसल्याने यावरून सतत नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या आगामी कुंभमेळा आणि त्यासाठी येणाऱ्या अडीच हजार कोटी रुपयांच्या विकासनिधीमुळे भाजपला नाशिकचे पालकमंत्रीपद आपल्या ताब्यात ठेवायचे असल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा निर्णय पेंडिंग ठेवला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव अधिकच चिघळला आहे.

अफलातून सल्ला
या वादात काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल भाषेत सरकारला सल्ला दिला आहे. पालकमंत्री पदासाठी भांडण करत बसण्यापेक्षा रोटेशन पद्धतीने एक वर्ष भाजप, एक वर्ष राष्ट्रवादीने पालकमंत्री नेमावे. महाराष्ट्रात खो-खो खेळ प्रसिद्ध आहे, तसा महायुतीने मंत्र्यांना खो देण्याचा खेळ शिकवावा,” असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
नाशिकप्रमाणेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरूनही महायुतीत वाद निर्माण झाला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेने जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने रायगडवर दावा केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपापसात चर्चा करून तोडगा काढण्याचा सल्ला दिल्याचे समजते.
कुंभमेळ्याच्या निधीवरून आरोप
नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवरच भाजपने गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपदी बसवण्याची तयारी सुरू केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते की, कुंभमेळ्याच्या निधीवर भाजप डोळा ठेवत आहे, त्यामुळेच ते आपला माणूस पालकमंत्रीपदी बसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या साऱ्या राजकीय गोंधळामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे भाजपचा आग्रह, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची नाराजी. त्यामुळे महायुतीतील समसमान वाटपाचा फॉर्म्युला लागू करता येईल का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नाशिक आणि रायगड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून महायुती सरकारमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत वादामुळे प्रशासनाचा गतीमान कारभार ठप्प होत असून, विरोधकांनीही या संधीचा पुरेपूर फायदा घेत सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.