
राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महिला सुरक्षेपासून ते कायदा-सुव्यवस्थेपर्यंत अपयशी ठरलेल्या सरकारवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली.
राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची लाट उसळली आहे. विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. कुणी शब्दांचे बाण झाडत आहे, तर कुणी जिभेवरचा ताबा हरपून थेट सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहे. या सगळ्या गदारोळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय. ग्रामीण भागात असंतोषाचा भडका उडालाय. शेतकऱ्यांची होरपळ, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली त्यांची आयुष्यं आणि त्यावर होत असलेली केवळ राजकीय बयानबाजी यामुळे राज्याचं वातावरण अक्षरशः पेटलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर चहापानावरून बहिष्काराची घोषणा करत जबरदस्त घणाघात केला.
वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, हे सरकार अपयश, भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या दलदलीत बुडालेलं आहे. शेतकऱ्यांपासून महिला सुरक्षेपर्यंत आणि बेरोजगारीपासून कायदा-सुव्यवस्थेपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर सरकार सपशेल अपयशी ठरलं असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा सरकारच्या चहा पाण्याला आम्ही जाणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात समित्यांची नौटंकी सुरू असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या मते, ज्या बळीराजाच्या श्रमावर महाराष्ट्राची पोटं भरतात, त्यालाच आता उपेक्षित केलं जातंय. ते म्हणाले, माजी मंत्री लोणीकर जेव्हा शेतकऱ्यांना म्हणतात, ‘तुला कपडे आणि चपला आम्ही दिल्या,’ तेव्हा हे सरकार किती विकृत मानसिकतेचं आहे, हे समजते.

खात्यांच्या वाटपाचं राजकारण
अशा सरकारसोबत चहापानाचा फोटो काढून काय करायचं?राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाले. पण दोन वर्षांपासून सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. नुकसान भरपाई तर दूरच, या सरकारकडे साधी दखल घेण्याचीही ताकद उरलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार थेट विचारतात, अशा सरकारच्या चहा पाण्याला का जायचं आम्ही? केवळ फोटोसाठी?कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर वडेट्टीवारांचा संताप शिगेला पोहोचला. ते म्हणाले, राज्यात खून, बलात्काराच्या घटना रोजच्या झाल्या आहेत. पोलिस यंत्रणेला कुणाचाही दर नाही. इतकं असुरक्षित महाराष्ट्र कधीच नव्हता. ते पुढे म्हणाले, आज महिला पोलीस अधिकाऱ्यांनाही सत्ताधाऱ्यांकडून त्रास सहन करावा लागतो आहे.
सरकारला ना महिला सुरक्षित ठेवता येत आहेत, ना कायदा-सुव्यवस्था सांभाळता येते. वडेट्टीवार यांचा आरोप केवळ कर्जमाफीपुरताच मर्यादित नव्हता. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात 3 हजार कोटींचा थेट भ्रष्टाचार उघड झाला आहे. सरकार केवळ वाटपाच्या भांडणात अडकले आहे. यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा खात्याच्या वाटपाची जास्त चिंता आहे. राज्यात कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. निधी मिळवायचा असेल, तर थेट टक्केवारी मांडावी लागते. ह्या सरकारच्या कार्यालयात दरवाज्यावर ‘टक्केवारी नसल्यास प्रवेश निषिद्ध’ असा फलक लावला तरी चालेल, असा उपरोधिक टोला वडेट्टीवारांनी लगावला. हे सरकार जनतेसाठी नाही, तर स्वतःच्या खिशासाठी चालतंय. त्यामुळे असा लढा आम्ही सुरूच ठेवणार, असं ठामपणे वडेट्टीवारांनी सांगितले. त्यांच्या या रोखठोक आणि धारदार वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं निश्चित.
Amravati : गणवेषाचा अभिमान रक्तात विरला; पोलिस अधिकाऱ्याची क्रूर हत्या