
राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याची चर्चा सुरू असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली. आर्थिक अडचणी असल्या तरी, योजना थांबवण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेवरून अधूनमधून चर्चेचं वादळ उठताना दिसतंय. राज्याच्या तिजोरीवर या योजनेमुळे प्रचंड आर्थिक ताण येत असल्याची ओरड काही नेत्यांकडून सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने मत व्यक्त केलं.
लाडकी बहीण योजना लागू करताना, त्याचा राज्याच्या तिजोरीवर होणाऱ्या परिणामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण सावध केलं होतं का? यावर अजित पवार स्पष्टपणे म्हणाले, जर मी त्यावेळी वस्तुस्थिती समोर ठेवली असती, तर आम्ही पुन्हा सत्तेत आलो नसतो. राजकारणात सत्ता मिळवणं महत्त्वाचं असतं, हे मी लक्षात ठेवलं.

आमचंही व्हिजन
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही काही साधू-संत नाही. आम्ही देखील विशिष्ट व्हिजन घेऊनच काम करतो. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी गरजेचे निर्णय घ्यावे लागतात. केंद्रात आमचं सरकार आहे. त्यांची साथ घेत राज्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक नियोजन करून आम्ही अडचणींवर मार्ग काढू.
अजित पवारांनी स्पष्ट केलं की, “लाडकी बहीण योजना किंवा अन्य कोणतीही लोकाभिमुख योजना बंद करण्याचा सरकारचा अजिबात विचार नाही. केंद्र आणि राज्य यांच्याकडून एकाच स्वरूपाच्या योजना सुरू असतील, तर केंद्राच्या योजनेचा लाभ घेऊन राज्याची योजना समायोजित केली जाते. सध्या केंद्र सरकारच्या बिनव्याजी कर्ज योजनेंतर्गतही आम्ही निधी मिळवतो आहोत.”
भटकती आत्मा
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना ‘भटकती आत्मा’ असं म्हटलं गेलं होतं. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. शरद पवार राजकारणात अत्यंत अनुभवी आहेत. त्यांनी या विधानाचा उत्तम राजकीय वापर केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना ‘माझा आत्मा कांद्याला भाव मिळावा म्हणून भटकतो आहे’, ‘दुधाला दर मिळावा म्हणून भटकतो आहे’, असं सांगून त्यांनी जनतेचं लक्ष खेचलं, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी सांगितलं की, लोकसभा निवडणुकीत जे काही घडलं, त्यावरून धडे घेत विधानसभा निवडणुकीत आम्ही सरकारच्या कामगिरीवर भर दिला. लाडकी बहीण योजना, इतर विकासकामं यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली. याचा सकारात्मक परिणाम आमच्या पक्षाला मिळाला.
राज्याच्या तिजोरीवर ताण असला तरी, जनतेच्या हिताच्या योजना थांबवण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही, हे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. राजकारणात सत्ता मिळवणं, विकास साधणं आणि लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं यासाठीच आर्थिक नियोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा योग्य वापर केला जातोय, हेही त्यांनी ठामपणे सांगितलं.