
महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत आहेत. कुठे राजकीय घडामोडींना वेग येत आहे, तर कुठे पाच वर्षां आधीचे दिशा सालियान हत्या प्रकरण पुन्हा जोर घेत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले आहे.
नागपूर मध्ये दंगल झाल्यानंतर काँग्रेस कडून सत्यशोधक समिती नेमण्यात आली. त्या समितीमध्ये एक व्यक्ती अकोला दंगलीशी संबंधित असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल प्रफुल्ल पटेल म्हणाले की, नागपूर मध्ये जे घडले ते अतिशय दुर्दैवी आहे. आम्हाला सर्वांनाच असे वाटते की, असे घडायला नको. नागपुरात सध्या शांतता प्रस्थापित झालेली आहे. त्या एका रात्री शिवाय कुठेही कोणती अप्रिय घटना घडलेली नाही. त्यामुळे काँग्रेसची ही सत्यशोधक समिती काय करेल? ही समिती कोणते सत्य शोधेल? याची आपल्याला कल्पना नसल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. तर काँग्रेसने आधी स्वतःच आत्मचिंतन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या संदर्भात बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाली की, सीबीआय ही महत्त्वाची नामवंत संस्था आपल्या देशात आहे. अशा प्रकारचे कोणतेही घटना घडल्यास राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, अशा महत्त्वाच्या केसेस सीबीआय कडे सोपवत असतात. सगळ्यांचा विश्वास सीबीआयवर आहे. जर सीबीआयने सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली, असे क्लोजर रिपोर्ट मध्ये सांगितले असेल, तर ते आपल्याला मान्य करावे लागेल. सीबीआय पूर्ण चौकशी करूनच हा क्लोजर रिपोर्ट फाईल करत असते, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

चौकशीतून बाहेर पडेल सत्य
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव तुम्ही घेऊ नका. त्यासाठी मला उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा फोन आला होता, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, कदाचित नारायण राणे यांना अधिक माहिती असेल. परंतु मला जेवढी माहिती आहे, मी तितकेच बोलू शकतो. न्यायालयीन प्रक्रियेतून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. जी चौकशी सांगितली गेली आहे, ती चौकशी होऊ द्या आणि सत्य बाहेर पडू द्या. यावर आपण अधिक काय बोलणार, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता अभियान आम्ही सुरू केल आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात हे अभियान आम्हाला मोठ्या पद्धतीत राबवायचे आहे. ज्या लोकांना आमच्याशी जुळण्याचे आहे, त्या लोकांसाठी ही उत्तम संधी आहे. त्यामुळे अत्यंत गंभीरपणे हे अभियान आम्ही राबविणार आहोत. अजितदादा, सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते आपापल्या भागात हे अभियान जोरदार राबविणार आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.