
दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्या चौकशीची मागणी करत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची मॅनेजर दिशा सालियनच्या रहस्यमय मृत्यूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली होती. मात्र, आता पाच वर्षांनंतर दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धक्कादायक आरोपांसह याचिका दाखल केली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा गंभीर दावा केला आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं नाव असल्याने त्यांना कोंडीत पकडण्यात येत आहे.
दिशा सालियनच्या वडिलांच्या धक्कादायक आरोपांनंतर आता या मृत्यूवर अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालानुसार, दिशावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे दिशाच्या मृत्यूमागील संशयास्पद दाव्यांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Maharashtra Assembly : संविधान विचारमंथनात फडणवीस नेतृत्वक्षम
सावंत यांची प्रतिक्रिया
पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं. आमच्या तरुण मुलाला तुम्ही विनाकारण बदनाम केलं. त्याच्या वेदना आम्हालाही जाणवतात. इतक्या प्रामाणिक आणि निर्व्यसनी मुलावर असे घाणेरडे आरोप लावणं ही मोठी चूक आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव याप्रकरणात गोवल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) संतप्त झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, आता सत्य समोर आले आहे. न्यायाला उशीर लागतो, पण विजय सत्याचाच होतो. आमचा आदित्य कसा आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. महाराष्ट्रभर लोक त्याला ओळखतात. त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप निंदनीय आणि खोटे होते. महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या स्तरावर नेलं जातंय, हे यातून दिसतं.
नार्को टेस्ट करा
दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या नव्या आरोपांवर अरविंद सावंत यांनी मोठा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी थेट दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. सावंत म्हणाले, पाच वर्षांनंतर अचानक असा साक्षात्कार कसा झाला? त्यांना आता या प्रकरणावर बोलण्याची गरज का वाटली? याचा शोध घ्यायला हवा. त्यामुळे दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करून सत्य बाहेर आणावे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा उफाळल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर आरोप केले, तर आता शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट)ही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढे काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.