
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात नवोन्मेषी पद्धतीने मदत पोहोचवणाऱ्या ‘ई-पंचनामा ॲप’ ला राज्य शासनाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्काराने गौरवले आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीतील प्रशासकीय यंत्रणांनी विविध नवोपक्रमांसाठी राज्यस्तरीय सन्मान पटकावले आहेत.
राज्य शासनाने प्रशासकीय प्रणालीत गतिमानता आणि नवोपक्रम वाढविण्यासाठी वर्ष 2023-24 आणि 2024-25 मध्ये ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ राबविली. या स्पर्धेत विभागीय, जिल्हा, महानगरपालिका आणि तालुका स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्हाधिकारी कार्यालये, नागपूर जिल्हा परिषद आणि गडचिरोली जिल्ह्यातील नायब तहसीलदार यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
विशेषतः, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी विकसित केलेल्या ‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमाची दखल घेत त्यांना 2023-24 चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपयांच्या रोख बक्षिसाचे आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रथम क्रमांक
महानगरपालिकांच्या श्रेणीत नागपूर महानगरपालिकेने आर्थिक व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या ‘फायनान्सियल अकाउंटिंग सिस्टिम’ या अभिनव उपक्रमामुळे प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुरस्काराचे स्वरूप देखील 10 लाख रुपये रोख रकमेचे आहे. चंद्रपूर महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला असून त्यांना 4 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता धारकांसाठी मालमत्ता कर भरण्याच्या अनोख्या प्रणालीची अंमलबजावणी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विकसित केलेल्या ‘चॅटबॉट प्रणाली’च्या मदतीने नागरिकांना नैसर्गिक आपत्तीबाबत पूर्वकल्पना देण्याच्या अभिनव उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कल्पना व उपक्रम गटात प्रथम क्रमांक आणि मोठा सन्मान मिळाला आहे.
वनहक्क सक्षमीकरणासाठी सन्मान
वर्ष 2024-25 मधील प्रशासकीय गतिमानता स्पर्धेत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाने लोकसहभागातून सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे सक्षमीकरण करण्याच्या उपक्रमात उत्कृष्ट योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला असून त्याचे स्वरूप 4 लाख रुपये रोख बक्षीस असे आहे.
नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी ‘दवाखाना आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. यासाठी त्यांना 20 हजार रुपये रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयाचा गौरव
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार निखील पाटील यांनी नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरविण्यासाठी विकसित केलेल्या एकाच मोबाईल ॲपमधून सर्व सेवांची माहिती देणाऱ्या उपक्रमास प्रशंसा मिळाली आहे. त्यामुळे त्यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून याचे स्वरूप 30 हजार रुपये रोख बक्षीस असे आहे.
Maharashtra Assembly : संविधान विचारमंथनात फडणवीस नेतृत्वक्षम
महानगरपालिका श्रेणीत चंद्रपूर महानगरपालिकेने ‘सौंदर्यीकरण अभियान’, जलाशय व पाणीसाठ्यांची स्वच्छता, शाळा इमारत नूतनीकरण, सुंदर माझे उद्यान, ओपन स्पेस स्पर्धा, रस्त्यांचे सुशोभिकरण आणि विविध शिल्प उभारणीसारखे उपक्रम राबवले. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना 4 लाख रुपये रोख पुरस्कार देण्यात आला आहे.
‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-24’ मधील विजेत्यांची घोषणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंबाने करण्यात आली होती. अखेर, 26 मार्च 2025 रोजी शासन निर्णयाद्वारे सर्व विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना प्रेरणा मिळावी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले आहे. प्रशासकीय कार्यक्षमता आणि नवोपक्रम यांचे उत्तम उदाहरण सादर करणाऱ्या सर्व विजेत्यांचे राज्य शासनाकडून आणि विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.