राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शतकपूर्तीनंतर समाज परिवर्तन आणि राष्ट्रहिताच्या दिशेने नव्या जोमाने वाटचाल करीत आहे. पंचसूत्रांच्या माध्यमातून सामाजिक पुनर्रचनेचा संकल्प करत, संघ कार्याचा विस्तार अधिक व्यापक आणि प्रभावी केला जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वर्षी आपल्या स्थापनेच्या 100 वर्षांचा टप्पा पार करत आहे. या विजयादशमीला संघाला शतकपूर्ती होत आहे. या निमित्ताने समाज परिवर्तन आणि संघ कार्याच्या विस्ताराला नवा आयाम देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. संघ कार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संघ आपल्या कार्याच्या शतकपूर्तीनंतरही अधिक वेगाने आणि व्यापक दृष्टिकोनातून समाजहिताच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
संघाच्या बंगळूर येथे झालेल्या प्रतिनिधी सभेत पंच परिवर्तन या पाच सूत्रांवर विशेष भर देण्याचा संकल्प करण्यात आला. स्वयंपूर्ण व्यवस्था, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य या पंचसूत्रांच्या आधारे संघ समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने पुढे जाणार आहे.
कार्याचा अध्याय
शतकपूर्तीनंतर संघाच्या कार्याचा विस्तार हा अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचून राष्ट्रहिताच्या दिशेने कार्य करणे, विविध सामाजिक सेवा उपक्रमांमध्ये सहभाग वाढवणे आणि नव्या पिढीपर्यंत संघाच्या विचारांची पताका पोहोचवणे या उद्दिष्टांवर भर दिला जाणार आहे.
संघाच्या सेवाकार्याची माहिती देताना विठ्ठल कांबळे यांनी स्पष्ट केले की, समाजातील दुर्बल घटकांना सक्षम बनवण्याच्या दिशेने संघ सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण विकास, शिक्षणप्रसार, आरोग्यसेवा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भविष्यात हे कार्य अधिक संघटित स्वरूपात आणि योजनाबद्ध रीतीने राबवले जाणार आहे.
सर्व पैलूंचा समावेश
संघाने प्रस्तावित केलेल्या पंच परिवर्तनात समाजव्यवस्थेच्या सर्व पैलूंचा समावेश आहे. स्वयंपूर्ण व्यवस्था निर्माण करून समाजातील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, अशी भूमिका आहे. पर्यावरण संरक्षण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे संघ आपल्या कार्यातून अधोरेखित करणार आहे.
सामाजिक समरसता हा संघाच्या विचारधारेचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. जात-पात, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन समाज एकसंघ होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कुटुंब प्रबोधन हा उपक्रम मजबूत कौटुंबिक व्यवस्था टिकवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंबसंस्था ढासळत असताना भारतीय संस्कृतीतील कुटुंबव्यवस्थेच्या संकल्पनांना नवे बळ देण्याचा हा उपक्रम असेल. नागरी कर्तव्य या तत्त्वाच्या माध्यमातून देशवासीयांनी संविधानिक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळ द्यावे, हा संदेश दिला जाणार आहे.
समाज परिवर्तनाचा प्रारंभ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती निमित्त हा केवळ उत्सव नाही. नव्या संकल्पांच्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल आहे. समाजात स्वावलंबन, समरसता आणि राष्ट्रभक्ती यांना बळकटी देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संघ कार्य करीत आहे. शतकपूर्तीनंतरही संघाच्या विचारधारेचा आणि कार्याचा प्रभाव वाढत जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संघाच्या नेतृत्वाखाली समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी विविध स्तरांवर कार्य केले जाणार आहे. पंचसूत्रांच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाच्या दिशेने निर्णायक वाटचाल सुरू झाली आहे. संघाच्या सेवाकार्याचा हा विस्तार आगामी काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रभाव टाकणारा ठरणार आहे.
