महाराष्ट्र

Ajit Pawar : फक्त दहा मिनिटे उपस्थित राहणाऱ्या ठाकरेंना कामकाज कसे समजेल? 

Mahayuti : उपमुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर 

Author

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचा वारा वेगाने वाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनावरून सरकारवर निशाणा साधला. यावर राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. या अधिवेशनात सरकारने कोणत्याही नव्या घोषणा केल्या नाहीत, असा आरोप करत ठाकरे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. विधिमंडळात प्रत्यक्ष काम केले तर त्यांना या विषयांचा अर्थ समजेल. फक्त पाच-दहा मिनिटे हजेरी लावून संपूर्ण अधिवेशनाचे आकलन होणार नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला.

अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, “विधिमंडळाचे अधिवेशन तब्बल चार आठवडे चालले. आम्ही दररोज तब्बल 9 तास काम करत होतो. मात्र, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किती वेळ सभागृहात उपस्थित होते? त्यांनी कोणताही महत्त्वाचा मुद्दा मांडला नाही. विरोधकांकडे कोणताच ठोस मुद्दा उरलेला नाही, म्हणून ते केवळ सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Amit Shah : देशातील घुसखोरांवर गृहमंत्री बरसले

योजनेबाबत मोठा निर्णय

राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘लाडकी बहिण’ आणि वीज बिल माफी योजनेबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “या योजना बंद केल्या जाणार नाहीत. पुढील पाच वर्षे ‘लाडकी बहिण’ योजना सुरूच राहील. 2100 रुपये कधी द्यायचे, याबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल,” असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “विधिमंडळात काम करूनच निर्णय घेतले जातात. केवळ बाहेरून आरोप केल्याने काही सिद्ध होत नाही. सरकार प्रामाणिकपणे काम करत असून विरोधकांनी टीका करण्यापेक्षा विकासाच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

संघर्ष वाढणार?

अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील या शाब्दिक युद्धामुळे राज्याच्या राजकारणात आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात या मुद्द्यावर विरोधकांची पुढील भूमिका काय असेल आणि सरकार त्यावर काय उत्तर देईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!