
विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत भास्कर जाधव यांनी जॅकेट चढवले. सत्ता-समीकरणांच्या खेळात आठ दिवसांतच ते उतरवावे लागले.
राज्याच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाचा संघर्ष चांगलाच रंगला. शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांना महाविकास आघाडीने या पदासाठी शिफारस केली. विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळणार या विश्वासाने जाधव यांनी नव्या उत्साहाने आपला राजकीय पोशाख बदलला. मात्र अवघ्या आठ दिवसांतच ही संधी हुकली आणि त्यांच्या जॅकेटचा उत्साहही ओसरला.
विधानसभेचे अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी सुरू झाले. 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर 11 मार्चला महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी अधिकृत शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आली. या शिफारशीने जाधव यांचा आत्मविश्वास उंचावला आणि 12 मार्चपासून त्यांनी जॅकेट घालण्यास सुरुवात केली. मात्र अधिवेशन संपता-संपता जॅकेट उतरवण्याची वेळ त्यांच्यावर आली.

सभागृहातील संघर्ष
सभागृहात विरोधकांनी सातत्याने विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीसाठी आवाज उठवला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत यावर आग्रह धरला. मात्र सत्ता पक्षाने कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने ही नेमणूक रखडली.
Chandrapur : राजकीय दुर्लक्षामुळे वर्धा-वैनगंगा मृत्यूपंथाला
भास्कर जाधव यांनी सुरुवातीला या पदासाठी प्रबळ उमेदवारी लावली होती. मात्र परिस्थिती बदलत गेली तसे त्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली. शेवटी 19 मार्चपर्यंतही विरोधी पक्षनेतेपदाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे जाधव यांनीही आपली प्रतिकात्मक जॅकेट घालण्याची सवय थांबवली.
नियमांची अडचण
राज्यातील विरोधकांची स्थिती पाहता 10 टक्के संख्याबळाचा नियम अडसर ठरला. 1952 पासून लोकसभेत लागू असलेल्या या नियमामुळे 2014 मध्ये काँग्रेसचे राहुल गांधी यांनाही विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. राज्यातही हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे भास्कर जाधव यांना संधी असूनही अंतिम निर्णय मिळवता आला नाही.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हा निर्णय घेण्याचे अधिकार होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी याबाबत कोणताही स्पष्ट निर्णय घेतला नाही. त्यामुळे विरोधकांना अधिवेशन संपेपर्यंत अधिकृत नेता मिळाला नाही.
पावसाळी अधिवेशनाची उत्सुकता
आता राज्याचे पुढील पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 रोजी सुरू होणार आहे. या अधिवेशनात विरोधकांना अधिकृत नेता मिळतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत आहेत. शिवसेना पक्षाने पुन्हा नव्या नावाच्या शिफारशीसाठी तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे.
भास्कर जाधव यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा प्रयत्न असफल ठरला असला तरी त्यांच्या राजकीय प्रवासाचा पुढील टप्पा कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.