महाराष्ट्र

Nitesh Rane : राणेंच्या विधानांवर संतापाचा भडका, मोदींकडे तक्रारीचा तडका 

National Commission for Minorities : नागपूरसह अमरावतीत गुन्हा दाखल

Author

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या बुरख्यासंदर्भातील आणि अल्पसंख्यांक समाजावरील विधानावर अल्पसंख्याक आयोग आक्रमक घेत आहे. नितेश राणे यांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत राजकीय वातावरण तापवले आहे. त्यांच्या या विधानांमुळे अल्पसंख्याक समाजात नाराजीचा सूर उमटत आहे. अलीकडेच त्यांनी बुरख्याबाबत वादग्रस्त टिप्पणी करत पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले. यामुळे महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी संताप व्यक्त करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्यारे खान यांनी नितेश राणेंच्या बेजबाबदार वक्तव्यांवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील भाजप सरकार “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या तत्त्वावर कार्यरत आहे. मात्र, नितेश राणेंच्या वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. खान यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राणेंनी मुस्लिम समाजाविषयीचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यांचे विधान समाजात तेढ निर्माण करणारे आहेत आणि त्यामुळे धार्मिक तणाव वाढतो.

Amit Shah : शिवरायांचा जो करेल अपमान, त्याला व्हावे कठोर संधान 

कारवाईचा इशारा

हलाल मटण, मल्हार मटण सर्टिफिकेट, औरंगजेब प्रकरण आणि इतर संवेदनशील मुद्द्यांवरही नितेश राणेंच्या आक्षेपार्ह विधानांमुळे वातावरण तापले आहे. त्यामुळे अल्पसंख्याक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. राज्यात विविध भागांतून नितेश राणेंच्या मुस्लिम समाजविरोधी वक्तव्यांविरोधात तक्रारी दाखल होत आहेत.

नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, प्यारे खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औपचारिक तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. खान पुढे म्हणाले, “भारत ‘सबका विकास’च्या धोरणावर वाटचाल करत आहे. मात्र अशा वादग्रस्त विधानांमुळे समाजात फूट पडते. अल्पसंख्याक मंत्री म्हणून, मी स्वतः हे प्रकरण थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवीन आणि आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करीन.

Amravati : धान्य अफरातफर करणाऱ्यांवर कठोर दंड

कायदेशीर कारवाई

नितेश राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे अमरावतीतही वाद निर्माण झाला आहे. अचलपूरमध्ये एका सभेदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू जन आक्रोश सभेत केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 196 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अचलपूर पोलिस ठाण्यात इमरान खान असलम खान यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर नितेश राणे आणि सागर भैय्या बेग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

नितेश राणेंच्या सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे भाजप सरकारसाठीही अडचणी निर्माण होत आहेत. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व समाजाच्या हितासाठी काम करत असल्याचे सांगतात, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षातील मंत्री अशा वक्तव्यांमुळे वाद वाढवत आहेत. अल्पसंख्याक आयोगाने आता कठोर भूमिका घेतली आहे. पुढील कारवाई काय होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!