
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर भाष्य करताना सांगितले की, मोहन भागवत आणि मोदी जेव्हा भेटतात, तेव्हा त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू देशहित असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा विशेष ठरणार आहे, कारण सलग दहा वर्षांनंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) भूमीवर पाऊल ठेवणार आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी आणि RSS प्रमुख मोहन भागवत यांच्यात देशाच्या भविष्यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
याबाबत बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी खुलासा केला की, जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत भेटतात, तेव्हा त्यांचा चर्चेचा मुख्य गाभा देशहितासंबंधी असते. ‘ते दोघेही देशाला चांगले बनवण्यासाठी चर्चा करतात. संघाने केलेल्या कार्यात सुधारणा कशा करता येतील आणि आपले प्रयत्न अधिक कसे प्रभावी बनवता येतील, यावर त्यांचा भर असते,’ असे आंबेकर यांनी स्पष्ट केले.

सुधारण्याचा संदेश
आंबेकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘स्वयंसेवक म्हणून, संघाचा संदेश हा आहे की आपण स्वतःला सतत सुधारत राहावे आणि देशहितासाठी योगदान द्यावे. त्यामुळे त्यांच्या चर्चेचा उद्देश नेहमीच राष्ट्रविकासाशी संबंधित असतो.’ मात्र, त्यांच्या चर्चेतील सखोल तपशील फक्त ते दोघेच सांगू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपूरला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देतील.
संघाचे स्मृती मंदिर, ऐतिहासिक दीक्षाभूमी, माधव नेत्रालय आणि सोलर इंडस्ट्रियल एक्सप्लोझिव्हज यांचा समावेश मोदींच्या दौऱ्यात आहे. विशेषतः दीक्षाभूमी ही जागतिक स्तरावर महत्त्वाची बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाते, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या दौऱ्यामुळे मोदींच्या RSS असलेल्या संबंधांवर नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.
https://thelokhitlive.com/dhiraj-chaudhary-denies-involvement-in-kortakar-fugitive-incident/
विरोधकांची टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर टीका केली आहे. भाजपच्या विजयामागे मोदींचा नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा करिष्मा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, मोदी आता संघ मुख्यालयाला भेट देत आहेत, कारण भाजपचा खरा आधार संघच आहे. तसेच, वडेट्टीवार यांनी आरएसएसवर टीका करताना म्हटले की, हा संघ दोन समाजांमध्ये दरी निर्माण करणारा आहे.
मोदींच्या नागपूर दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे. संघ आणि भाजपच्या संबंधांवर नव्याने प्रकाश पडत आहे. विरोधकांनी या दौऱ्यावर आक्रमक भूमिका घेतली असली, तरी भाजप समर्थक मात्र याला ऐतिहासिक महत्त्व देत आहेत. मोदींची ही भेट येणाऱ्या काळात कितपत महत्त्वाची ठरेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.