
महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांकडून बँक कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत.यामुळे बँक संघटनांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध बँक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करत एक महत्त्वाचे पत्र सादर केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांकडून बँक कर्मचाऱ्यांवर मराठी भाषा सक्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे बँकिंग व्यवहार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या राज्यातील प्रमुख बँक संघटनेने या घटनांचा तीव्र निषेध करत बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील अनेक बँकांमध्ये मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेत सूचना फलक लावले गेले आहेत. परंतु तरीही मनसे कार्यकर्ते शाखांमध्ये घुसून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहेत आणि मराठी न बोलणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावत आहेत.

Harshwardhan Sapkal : कोकाटेंच्या सत्तेचा माज शेतकरीच उतरवणार
राजकीय रंग गडद
मनसे कार्यकर्त्यांनी 1 आणि 2 एप्रिल रोजी मुंबई व ठाण्यातील बँक शाखांमध्ये घुसून व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना धमकावले. मराठी येत नसेल, तर काम करु नका, असा इशारा देत काही ठिकाणी शारीरिक मारहाणही करण्यात आली. काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना फुले व दगड देऊन प्रतिकात्मक धोक्याचा इशारा दिला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेचा सन्मान राखणे गरजेचे आहे, असे मत मांडले. मात्र त्याचवेळी कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होईल, असे स्पष्ट करत राज्य सरकारने कारवाईचा इशारा दिला.
गेल्या काही वर्षांपासून स्थिर वाटणाऱ्या भाषिक वादाला राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणाने पुन्हा पेटवले आहे. मराठी भाषा सक्तीची केली पाहिजे आणि ती टाळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या विधानानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कृती करून बँकांमध्ये धडक मारली आणि बळजबरी सुरू केली. यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा डळमळीत झाला आहे. विविध भाषिक समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बँक कर्मचारी सध्या मानसिक दबावाखाली काम करत आहेत आणि ग्राहक सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
कायद्याचा धक्का बसणार
मनसेचा इतिहास पाहता, 2006 मध्ये शिवसेनेपासून विभक्त झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी माणूस या अजेंड्यावर ठाम भर दिला होता. त्यानंतर दुकानांवरील नावफलक, रेल्वे भरती परीक्षा, मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे प्रदर्शन यासारख्या मुद्द्यांवर आंदोलन झाले होते. अनेकवेळा या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले.सध्याच्या घडामोडी त्या पार्श्वभूमीवरच नव्याने आकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र यावेळी बँक कर्मचारी वर्ग थेट टार्गेट होत असल्यामुळे आर्थिक व्यवहार आणि सामान्य जनतेच्या सेवा यावर त्याचा खोल परिणाम होत आहे.
तेरा जागांवर 2009 साली विजय मिळवणाऱ्या मनसेला नंतरच्या काळात राजकीय पातळीवर टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि भाषिक अस्मितेचा मुद्दा उचलण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहून यासाठी प्रयत्न व्हावेत, अन्यथा शासनाच्या कारवाईचा सामना करावा लागेल, हे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून दिले गेले आहेत.राजकीय हेतू आणि भाषिक भावनांच्या संघर्षात सामान्य बँक कर्मचारी भरडले जात आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तातडीने ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.