
राज्याच्या महायुती सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ठोस कामगिरी करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे आदिवासी विभागात सकारात्मक बदल घडत आहेत.
राज्याच्या महायुती सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आपल्या ठोस कार्यपद्धतीतून वेगळी छाप पाडली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कामगिरीच्या आराखड्यात आदिवासी विभाग पहिल्या पाच खात्यांमध्ये असेल, असा आत्मविश्वास व्यक्त करणारे उईके, आता प्रत्यक्ष कृतीतूनही तो आत्मविश्वास सिद्ध करत आहेत. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे संपूर्ण यंत्रणा नव्या जोमाने कार्यरत झाली आहे.
महायुती सरकार स्थापनेनंतर अनेक मोठ्या नेत्यांचा राजकीय प्रवास थांबला असतानाही, उईके यांचे कर्तृत्व आणि निर्णयक्षमता त्यांना वेगळी ओळख देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिशील नेतृत्वाला साथ देताना, उईके यांनी मंत्रिमंडळातील निष्क्रियतेवर थेट बोट ठेवले आहे. जो काम करणार नाही, त्याला काम करायला लावलं जाईल, असा स्पष्ट संदेश आपल्या कृतीतून दिला आहे.

सक्रीय बदलांची गती
उईके यांनी आदिवासी विभागात सुधारणा करण्याचे अनेक पावले उचलले आहेत. त्यांनी आश्रमशाळांमध्ये थेट रात्रभर मुक्काम करून विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या. केवळ शासकीय बैठका आणि कागदोपत्री अहवालांवर विश्वास न ठेवता, प्रत्यक्ष शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबत भोजन घेत तेथील अन्नाचा दर्जा तपासला. या प्रत्यक्ष सहभागामुळे कंत्राटदारांच्या गोंधळाला चाप बसत आहे. आदिवासी विभागात पारदर्शकता येऊ लागली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी विभागाला मिळणारा साडेनऊ टक्के निधी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या पाच टक्के निधीचा प्रभावी वापर कसा करायचा, यावर उईके यांचे विशेष लक्ष आहे. अनेक वर्षे प्रचंड निधी असूनही विकास न झाल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी निधी कुठे वाया जातोय याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
विश्वासार्ह चेहरा
अशोक उईके हे केवळ आदिवासी समाजाचेच नव्हे, तर महायुती सरकारमधील एक विश्वासार्ह आणि क्रियाशील चेहरा म्हणून पुढे येत आहेत. प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर जबाबदारीची जाणीव करून देत, त्यांनी काम करा किंवा जबाबदारी सोडा हा संदेश मंत्रिमंडळात पसरवला आहे. त्यांच्या नेतृत्वशैलीमुळे आदिवासी विकास खातं नव्या उंचीवर पोहोचत आहे.
पुढील काळात उईके यांचे धोरण हे इतर मंत्र्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. प्रशासनाला झोपेतून जागं करणाऱ्या त्यांच्या कार्यशैलीकडे राज्याच्या जनतेचंही लक्ष लागलेलं आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी निधीचा प्रभावी वापर, शिक्षण व पोषण योजनांमधील सुधारणा आणि पारदर्शक कारभार ही उईके यांच्या कारकिर्दीची प्रमुख वैशिष्ट्यं ठरत आहेत.