
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. या ऐतिहासिक उपक्रमासाठी पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचे मोलाचे योगदान आहे.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद (ICSSR) तर्फे देशभरात विविध शैक्षणिक, सामाजिक व महिला केंद्रित उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामागे माजी खासदार व धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
राजमाता अहिल्याबाई होळकर या केवळ मराठा साम्राज्याच्या महान प्रशासक नव्हत्या, तर त्या दूरदृष्टीच्या अध्यात्मिक नेत्या सुद्धा होत्या. त्यांनी समाजाच्या सर्व थरांमध्ये समरसतेचा संदेश दिला आणि विशेषतः भटक्या व अर्धभटक्या जमातींना प्रेरणा देत सामाजिक समावेशाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या जीवनकार्याचा आणि आदर्शाचा जागर करण्यासाठी 2025 हे वर्ष ‘राजमाता अहिल्याबाई होळकर 300 वा जयंती वर्ष’ म्हणून देशपातळीवर साजरे होणार आहे. या उपक्रमासाठी डॉ. महात्मे यांनी दिल्ली व महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र शासनाचं पूर्ण सहकार्य लाभल्याने अखेर ICSSR ने देशभरातील त्यांच्या अधिनस्त विद्यापीठे व संशोधन संस्थांना स्पष्ट दिशानिर्देश दिले आहे.

Devendra Fadanvis : वारसदार कशाला जेव्हा बादशाह खुद गादीवर आहे
अनेक उपक्रम
उपक्रमांतर्गत महिलांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्पांची उभारणी करण्यात येईल. कौशल्यविकास कार्यशाळा निर्माण करण्यात येणार. आरोग्य व स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल. लैंगिक समानतेसाठी जनजागृतीचा प्रसार करण्यात येईल. स्वसंरक्षण प्रशिक्षण, डिजिटल साक्षरता वाढविणे, अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
देश व परदेशातील शैक्षणिक संस्था राजमाता अहिल्याबाईंच्या जीवनावर आधारित संशोधन प्रकल्प, परिसंवाद, चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित करणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये देशातील प्रमुख इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ यांचा सहभाग असणार आहे. डॉ. विकास महात्मे यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच ICSSR च्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या मते, ही केवळ राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करणारी गोष्ट नाही, तर महिलांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा करणारी सुरुवात आहे.
भारतातील सर्व घटक समाजांना समाविष्ट करून हा उपक्रम समतेचा आणि प्रगतीचा नवा अध्याय लिहिणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. महिलांना प्रबळ करण्यासाठी राजमाता अहिल्याबाईंचा आदर्श आजही तितकाच प्रासंगिक आहे. त्यांच्याच प्रेरणेतून नव्या पिढीसाठी समाजपरिवर्तनाचे दरवाजे खुला होणार आहेत.