
गांधी-सरदारांच्या भूमीतून काँग्रेसने नव्या राजकीय संघर्षाचा बिगुल वाजवला आहे. राष्ट्रीय अधिवेशनात यशोमती ठाकूर यांनी थेट मोदी सरकारला लक्ष्य करत जोरदार टीका केली.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सध्या गुजरातमधील अहमदाबाद येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. या अधिवेशनात काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील दिशा, रणनीती आणि धोरणांवर चर्चा होत आहे. यावेळी काँग्रेस कार्य समितीच्या (CWC) महत्त्वाच्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. विदर्भातील काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या देखील अधिवेशनासाठी उपस्थित होत्या. अहमदाबादच्या भूमीत उभं राहून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीत उभं राहून आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याची आठवण आजही आपल्याला प्रेरणा देते. मात्र त्याचबरोबर एक खंतही वाटते, स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारणाऱ्या सरकारने सरदार पटेल यांच्या नावाचं स्टेडियम बदलून त्याला स्वतःचं नाव दिलं. हे दुर्दैव आहे. एका महापुरुषाचा सन्मान करताना त्याचं नाव इतिहासातून पुसण्याचा हा प्रयत्न खरोखर खटकतो, असे ठाकूर म्हणाल्या.

Sandip Joshi : भाजपचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्याची तयारी
संविधान रक्षण
पुढे बोलताना ठाकूर यांनी सांगितले की, ही लढाई केवळ राजकीय नाही, ही एक आयडियालॉजिकल फाईट आहे. आम्ही कुणाचे वैयक्तिक शत्रू नाही, पण आम्ही देशाची विचारधारा, लोकशाही, संविधान आणि सर्वधर्मसमभाव वाचवण्यासाठी लढत आहोत. भारताला एकसंध ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांवर नेहमी चालत राहू आणि त्यांचे विचार जपणार, असे त्या म्हणाल्या.
भाजप आणि आरएसएसवर टीका करताना ठाकूर म्हणाल्या, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात काहीही योगदान दिलं नाही, ते आज देशभक्तीच्या गप्पा मारतात. ही लोकं कधीच सरदार पटेल यांना ‘हायजॅक’ करू शकत नाही. त्यांच्याकडे देशासाठी खरी भावना असती, तर त्यांनी स्टेडियमवर स्वतःचं नाव लावण्याऐवजी सरदार पटेल यांचं नाव जपलं असतं. जातीत फूट पाडून, समाजात तडे देऊन फक्त मतांचं राजकारण करणाऱ्यांना देशाचं भलं करता येणार नाही, असा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केला.
मी पण हिंदूच
ठाकूर यांनी स्पष्ट संदेश दिला की, “एका विशिष्ट धर्माचा ठेकेदार कोणीही होऊ शकत नाही. मी स्वतः हिंदू आहे, पण त्याचबरोबर काँग्रेसची कार्यकर्तीही आहे. सर्वधर्मसमभाव हेच आमचं तत्व आहे. कोणाचाही अपमान न करता, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे.
राष्ट्रीय अधिवेशनातून काँग्रेसने देशात नव्या राजकीय लढ्याची नांदी केली आहे. संविधानाचे रक्षण, लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना आणि सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे, हे यशोमती ठाकूर यांच्या भाषणातून स्पष्टपणे दिसून आले. काँग्रेसच्या या अधिवेशनाकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. आगामी काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहेत.