महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : दाऊदला आणले असते, तर मानले असते

Congress : 26/11 हल्ल्यातील आरोपीचा निवडणुकीसाठी वापर

Author

26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर निवडणूक लाभासाठी देशभक्तीचं नाटक केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या क्रूर अतिरेकी हल्ल्याच्या आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अशात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर तिखट शब्दांत टीका करताना म्हणाले की, राणाला लवकरात लवकर भारतात आणा आणि फाशी द्या. पण त्याचा वापर आगामी निवडणुकांमध्ये मतांसाठी करू नका.

वडेट्टीवार यांनी म्हटले, मुंबईवर अतिरेकी हल्ला करून शेकडो निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या तहव्वुर राणाला क्षमा करण्याचा कोणताही विचारही होऊ नये. त्याला लवकरात लवकर भारतात आणून कठोर शिक्षा देण्यात यावी, पण या गंभीर प्रकरणाचा राजकीय लाभ घेऊ पाहणाऱ्या भाजपचा हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधताना पुढे म्हटले, जर भाजप खरोखरच दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यात यशस्वी झाली असती, तर त्याला एक मोठी उपलब्धी मानली असती. कारण 26/11 मधील हल्ल्यामागे मुख्य सूत्रधार दाऊदच होता. पण तहव्वुर राणाला फक्त निवडणूक जवळ आली म्हणून उचलून आणणे, आणि त्यावर राजकारण करणे, हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.

केंद्राला सवाल

वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला की, “तहव्वुर राणाला भारतात आणण्यासाठी सरकारला तब्बल 15 वर्षे का लागली? हे अपयश कुणाचे आहे याचाही सरकारने खुलासा करावा. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. म्हणून त्याला भारतात आणण्याचा गाजावाजा सुरू आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. पुढे वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईकरांनी त्या हल्ल्यात मोठा त्रास सहन केला आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा गंभीर प्रकरणात भाजपने राजकारण करत, या कुटुंबांच्या वेदनांवर फुंकर घालण्याऐवजी त्यांचा उपयोग मतांसाठी करू पाहणे, हा त्यांच्या वेदनांचा अपमान आहे.

26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाला आज भारतात आणले जाणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळल्यानंतर त्याला अमेरिका सोडून भारतात पाठवले जात आहे. विशेष विमानाद्वारे त्याला भारतात आणले जात आहे. एनआयए मुख्यालय, पटियाला हाऊस कोर्ट आणि दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले की, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न राजकीय प्रचारात मिसळू नका. देशभक्ती दाखवायची असेल तर कृतीतून दाखवा. फक्त घोषणा आणि श्रेय घेऊन नव्हे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!